पश्चिम भागातील नागरिकांचे जगणे झाले मुश्कील
वार्ताहर / उचगाव
परराज्यांतून आलेल्या नागरिकांमुळेच पश्चिम भागातील गावांमधून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. रुग्ण आढळलेली गावे सील करण्यात आली आहेत.
प्रारंभी बेळगुंदी या एकाच गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला. मात्र, तो बरा झाला. पण या भागातील बाची, तुरमुरी, कोनेवाडी, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी, सुळगा, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा या गावात परप्रांतातून नागरिक आले. त्यांना गावातील प्राथमिक शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. काही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. ज्यांचे सात दिवस व चौदा दिवस पूर्ण झाले, पण त्यांचा स्वॅब अहवाल येण्याआधीच त्यांना घरी जाऊ देण्यात आले. मात्र, तीन-चार दिवसांनंतर काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठा गोंधळ माजला. क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर गावात फिरणे, घरोघरी जाऊन भेटणे, पाटर्य़ा करणे असे कार्यक्रम झाले. यातून आता किती जणांना कोरोना विषाणूची लागण झाली हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या भागात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
संपर्कात आलेले क्वारंटाईन
या भागातील ज्या-ज्या गावांमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, असे सर्व भाग सील करण्यात आले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आता पुन्हा चौदा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार, किती रुग्ण पुन्हा आढळणार याचीच चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.
कोरोना रुग्ण नव्हते त्यावेळी पोलीस बंदोबस्त कडक होता. मात्र, आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळूनदेखील अनेक गावांतून अद्याप पोलिसांचा पत्ताच नसल्याने नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. केवळ गावपातळीवरच गावे सील करण्याचे प्रयत्न चालू आहेत. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून जवळपास 75 रुग्ण क्वारंटाईनमध्ये आहेत. यामध्ये उचगाव 31, अतिवाड 38, सुळगा 2 व तुरमुरी 4 अशी संख्या आहे.