वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसनिर्मिती आणि वितरण मोहीम याच्या तयारीने वेग घेतला आहे. लसनिर्मितीत तीन वैद्यकीय कंपन्या आघाडीवर असून डोसचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी देशात विविध ठिकाणी कोल्ड स्टोरेज पॉईंट्सची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या विशेष दलाकडून यासंबंधीची तयारी सुरू आहे. त्यानुसार देशात तब्बल 28,947 शीत साखळी केंद्रे उभारली जाणार असल्याची माहिती बुधवारी सूत्रांकडून देण्यात आली.
कोरोनाविरोधी लसीला भारतात अनुमती मिळाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना लस दिली जाणार आहे. देशात जवळपास 3 कोटी जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. देशात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात रुग्णांची संख्या घटण्याबरोबरच मृतांचा आकडाही कमी झालेला आहे. नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱयांचा आकडा वाढत असल्याने देशात सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये घट
सध्या देशभरात 3 लाख 78 हजार 909 सक्रिय रुग्ण आहेत. देशात बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 402 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात देशात 32 हजार 080 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात एकूण 1 लाख 41 हजाराहून अधिक कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बाधित रुग्णांचा एकूण आकडा 97 लाख 35 हजार 850 इतका आहे. त्यापैकी 1 लाख 41 हजार 360 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 92 लाख 15 हजार 581 रुग्ण बरेही झाले आहेत.
सध्या 3 लाख 78 हजार 909 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.