ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 0.75 टक्के, तर रिव्हर्स रेपो दरात 0.90 टक्क्यांची कपात केल्याचे आज जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्जे आता स्वस्त होणार आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदी, या आपत्तीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम याविषयी ऊहापोह केला. ते म्हणाले, यामुळे जागतिक मंदीची शक्यता आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य ती पावले उचलली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रिव्हर्स व रेपोदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जावरील व्याजदर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आणला आहे. तसेच अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजदरातही घट करण्यात आली आहे. याबरोबरच कर्जाच्या हप्त्याची वसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला बँकांना दिला असल्याचे शक्तिकांत दास यांनी या वेळी सांगितले.