पालकमंत्र्यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने कोरोनाचे नियम घालून दिले आहेत. मात्र या नियमांचे पालन होत नाही. ही बाब गंभीर आहे. असे असले तरी शहरासह ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना कशामुळे वाढत आहे याचे निरीक्षण करण्यासाठी एक टास्क फोर्सची नियुक्ती करा, अशी सूचना पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना केली आहे.
कोरोनामुळे बाहेर गेलेले कामगार परतत आहेत. त्या कामगारांना काम देणे ही काळाची गरज आहे. तेंव्हा उद्योग खात्री योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. तेंव्हा प्रत्येक वॉर्डामध्ये तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक खेडय़ामध्ये भाजीपाला व प्रत्येक वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यवस्था करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाबत दहशत निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मात्र काही जण जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत. त्या थांबविणे गरजेचे आहे. सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यकतेनुसार पोहोचवत आहे. काही जण कृत्रिम टंचाई निर्माण करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरही नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व तालुक्मयांत कोविड सेंटरची स्थापना करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवावा, प्रत्येक हॉस्पिटलमधून बेडची संख्या ही प्रत्येकाला समजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पारदर्शकपणा ठेवा. जिल्हय़ात जी लस दिली आहे त्याची माहिती जमा करून ठेवा. स्थलांतरित व्यक्तींची माहिती देखील ठेवावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
सार्वजनिक सल्लागार समिती नेमून सरकारच्या मार्गसुचीनुसार त्यांनी काम करावे. लहान घरे असलेल्या व्यक्तींमधील कोणालाही संसर्ग झाल्यास त्याची सोय निवासी शाळा, वसतिगृह, हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या इमारतीत करावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.