देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
उत्सवकाळात पूजा, धार्मिकविधी होणार परंपरेनुसार
मंदिर परिसरात लाईव्ह दर्शनची सुविधा
प्रतिनिधी / कोल्हापूर
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा यंदाचा नवरात्रौत्सव कोरोना पार्श्वभूमीवर लोकसहभागाविनाच होणार आहे. मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहेत. मात्र मंदिर परिसरात आठ ते दहा ठिकाणी भाविकांना लाईव्ह दर्शनची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रौत्सवाची देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनां संदर्भात समितीकडून नवरात्रौत्सवाशी संबंधित असणाऱया सर्व प्रशासकीय घटकांबरोबर बैठका घेवून त्यांच्याकडून सूचना घेतल्या जात आहेत. बुधवारी नवरात्रोत्सवा संदर्भात पोलीस प्रशासनाबरोबर बैठक झाली. बैठकीनंतर अध्यक्ष जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत करवीर निवासिनीच्या नवरात्रौत्सवाची रुपरेषा थोडक्यात स्पष्ट केली.
याप्रसंगी बोलताना जाधव म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर करवीर निवासिनीचा यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने होणार आहे. मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी उत्सवा दरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी यंदाही परंपरेनुसार होतील. मात्र यामध्ये लोकसहभाग नसणार आहे. पंचमी, अष्टमी आणि नवमीला होणारा देवीचा पालखी सोहळा यंदाही होईल. मात्र यंदा पालखी सोहळा पायी एवजी वाहनातून होईल, असे जाधव यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, आयुक्त आणि पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत बैठक घेवून त्यांच्या सुचनेनुसार पुढील दोन दिवसात नवरात्रौत्सवाचे स्वरुप स्पष्ट करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
भाविकांसाठी लाईव्ह दर्शनची सुविधा
कोरोना पार्श्वभुमीवर अंबाबाई मंदिर भाविकांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. नवरात्रौत्सव काळातही मंदिराची चारही प्रवेशद्वारे बंद राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे याकरीता मंदिर परिसरात आठ ते दहा ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे लाईव्ह दर्शनची सुविधा देवस्थान समितीकडून केली जाणार आहे.
धार्मिक विधी परंपरेनुसारच
उत्सव काळात देवीचे सर्व धार्मिक विधी परंपरेनुसारच होतील. टेंबलाई, त्र्यंबोली, तुळजाभवानी भेट, नगरप्रदक्षिणा, पालखी सोहळा ही नियमितपणे होईल. मात्र यंदा तो पायी ऐवजी वाहनातून होईल. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देवीचे सर्व धार्मिक विधी, कार्यक्रम परंपरेनुसारच होतील. मात्र यामध्ये लोकसहभाग असणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.