गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने घेतला निर्णय
प्रतिनिधी / इचलकरंजी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही गर्दी कमी होत नाही. या अनुषंगाने मंगळवारपासून वॉर्ड एक दिवस आड बंद करण्यात येणार आहेत. बंद दिवशी वैद्यकीय सेवेखेरीज अत्यावश्यक सेवाही बंद केले जाणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानावर लक्ष ठेवण्यात येणार असून ज्या दुकानात नियमांचे पालन होत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून कोविड संपेपर्यंत दुकान सील करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
डॉ. खरात म्हणाले, बाजारात होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येथील मुख्य रस्त्यावर भाजीपाला, फळफळावळ विक्रीस मनाई केली आहे. भाजीपाला व फळफळावळ विक्रीसाठी शहरातील विविध २२ जागा निश्चित केल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच साहित्यही जप्त करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, अपर तहसीलदार शरद पाटील आदी उपस्थित होते.