एसटीच्या फेऱ्या रोडावल्या मुलींच्या शिक्षणावर गदा
मुक्कामी गाड्या सुरू करण्याची मागणी
वार्ताहर / यमगे
नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू होऊन देखील अद्याप ग्रामीण भागातील दुर्गम परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहराकडे येण्यासाठी एसटी बस सेवा पूर्ववत न झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे. आर्थिक दृष्ट्या हलाखीची असणाऱ्या कुटुंबांसाठी मुलांचा दैनंदिन शालेय प्रवास खर्च हा आवाक्याच्या बाहेरचा आहे.त्यामुळे अनेक कुटुंबातील फक्त मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील 50 हून अधिक खेड्यांना मध्यवर्ती असणारे शहर वजा गाव म्हणजे मुरगूड. या गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, संगणक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उच्च माध्यमिक विभाग, पोलीस आणि सैन्य
भरती पूर्व तयारी वर्ग, किमान कौशल्य,वरिष्ठ महाविद्यालय,खाजगी क्लासेस असा शिक्षणाचा खूप मोठा विस्तार आहे. शहरात शिक्षणासाठी दररोज पाच हजारहून अधिक विद्यार्थी ये-जा करतात. नोव्हेंबर महिन्यात सर्व शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने कोरोना नियमांचे पालन करत सुरू झाल्या असल्या तरी शहरात येणाऱ्या सर्व एसटी बसेस अद्याप सुरू झाल्या नाहीत. ज्या एसटी बसेस सुरू आहेत त्या पुरेशा नाहीत.
पळशिवणे, हमीदवाडा मुक्काम,कापशी मुक्काम,वाघापूर मुक्काम(सावर्डे ,गोरंबे फेऱ्या),चिखली मुक्काम,बोळावी मुक्कामी एस टी बसेस फेऱ्या सुरू झाल्या नाहीत. निपाणी मार्गावर गारगोटी आगाराच्या फेऱ्या होत नाहीत.त्यामुळे राधानगरी आगाराच्या बसेस वर विद्यार्थ्यांचा दुप्पट लोड येतो. बसच्या मधल्या पॅसेजमध्ये तीन तीन ओळीत विद्यार्थी उभे राहतात. गाड्या खचाखच भरलेल्या असतात.त्यामुळे कोंडलेल्या बस मधून कोरोना नियमांचे पालन करणे शक्य होत नाही.महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिसून आले आहेत.या पार्श्वभूमीवर सर्व शाळा महाविद्यालयाने योग्य दक्षता घेतली असली तरी एस.टी.सारख्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतून सुरक्षित शारीरिक अंतर राखणे अशक्य झाल्याने कोरोना पसरण्याची भावाची भीती आहे.
सकाळी पावणे सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शहरातील शैक्षणिक संस्थांची कार्य सुरू असते अनेक विद्यार्थी पालक शिक्षक दिवसभर विविध वेळेला शहरात येत असतात. एसटी बसेस फेऱ्या नियमित नसल्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी खाजगी वाहतूक मोटर सायकल वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर त्याची वाहतूक करणारे दूध संघाचे टेम्पो यांचा वापर करून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलींची शाळा वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे बंद केली आहे.त्या ऐवजी हे पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत.दुर्गम भागातील एस.टी. वाहतुकीच्या फेऱ्या बंद झाल्या मुळे दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणावर गदा आल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत ग्रामीण भागातील शाळांमध्ये या परीक्षांची तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुलींच्या शिक्षणातील नुकसान टाळण्यासाठी कागल गारगोटी राधानगरी आगारातील प्रशासक आणि लक्ष घालून या मुक्कामी एसटी फेऱ्या पूर्ववत करावेत अशी मागणी होत आहे.