कोगे-बहिरेश्वर पुल पाठोपाठ सावरवाडी येथील नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळला
सावरवाडी -आरे दरम्यान अवजड वाहतूक धोकादायक
प्रतिनिधी / कसबा बीड (विश्वनाथ मोरे)
करवीर तालुक्यामध्ये जुन्या पुलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोगे- बहिरेश्वर पूल पाठोपाठ सावरवाडी येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळला आहे. त्यामुळे सावरवाडी-आरे दरम्यान अवजड वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.
गेल्या ३५ वर्षापूर्वी जिल्हा परिषदेने बांधण्यात आलेला करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षण कठडा कोसळल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतुक धोकादायक बनली आहे. संरक्षण कठड्याच्या नव्याने बांधकाम करण्याकडे मात्र आतापर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले. पावसाळ्यानंतर संरक्षण कठड्याचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावरवाडी गावच्या तिन्हीही बाजूनी तुळशी नदी वाहते. पूर्व पश्चिम आरे- सावरवाडी गावांना जोडणारा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. रस्त्यानजीक तुळशी नदीचे पात्र आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या ३५ वर्षापूर्वी संरक्षण कठड्याची उभारणी केली होती. नदीपात्रात पुराच्या पाण्याचा प्रवाह जादा असल्यामुळे संरक्षण कठड्यावर पाण्याचा दाब जादा पडतो. संरक्षण कठड्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झाल्याने मधील काही भाग गतवर्षी कोसळला होता. जून महिण्यात झालेल्या पहिल्या पावसामुळे पृष्ठभागाची पडझड होऊन संरक्षण कठड्याचा उर्वरित भाग कोसळला गेल्याने या मार्गावरील ग्रामीण भागातील होणारी अवजड वाहतुक धोकादायक बनली आहे.
तुळशी नदी पात्रातील संरक्षण कठड्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून होत असून शासकिय निधी अभावी कठड्याचे बांधकाम रखडले गेले. त्यामुळे जनतेत नाराजीचा सुर उमटू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोगे- बहिरेश्वर दरम्यान असणाऱ्या पुलामुळे जवळपास 700 हेक्टर जमीन राधानगरी धरण पाणी सिंचनाखाली जाते. त्याच बरोबर सारवाडी -आरे दरम्यान असणाऱ्या पुलामुळे जवळपास 100 हेक्टर जमीन तुळशी धरण पाणी सिंचनाखाली येते. या दोन्ही पुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचे मजबूत बांधकाम व शक्य झाल्यास नवीन पूल तयार करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा जवळपास ८०० हेक्टर जमीन पाण्याविना कोरडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पाटबंधारे विभागाने व प्रशासनाने या बाबीचा वेळीच विचार करून पावसाळा संपल्यानंतर या दोन्ही पुलाचे काम तत्परतेने करणे महत्त्वाचे आहे.