प्रतिनिधी/कोल्हापूर
बंदीजणांना कोरोनाच्या संसर्गाची लागण होऊ नये या उद्देशाने राज्य शासनाने काही बंदींना पॅरोल रजा व जमिनीवर सोडण्याचे आदेश कारागृहाला दिले आहेत. त्यानुसार कळबा मध्यवर्ती कारागृहातून आज पर्यंत १७८ बंदीजणांना पॅरोल रजा व जामिनावर सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात प्रचंड भितीचे वातावरण आहे. ही लाट आता देशातील कारागृहांपर्यंत पोहचली आहे. काही बंदीजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे पुढे आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या न्यायाधीश व सचिव पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या समितीने अभ्यासाअंती राज्यातील काही बंदीजनांना पॅरोल रजा व जामिनावर सोडण्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना दिले.
या आदेशानुसार राज्यातील अनेक कारागृहातून सात वर्षाच्या आत शिक्षा झालेल्या तसेच त्यापुढे शिक्षा झालेल्या, पण चांगले वर्तन असलेल्या बंदी जणांना ४५ दिवसाच्या पॅरोल रजेवर व काही बंदींना जामिनावर सोडण्यास सुरुवात झाली. कळंबा कारागृहामध्ये दोन हजार तीनशे जन शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी सहाशे बंदी जणांना या सवलतीचा फायदा होणार आहे. बुधवारी कळंबा कारागृहातून चार कच्च्या कैद्यांना अंतरिम जामीन तर अकरा बंदी जनांना पॅरोल रजेवर अशा पंधरा जणांना सोडण्यात आले. गेल्या पंधरा दिवसात १७८ जणांना या सवलतीचा फायदा मिळाला आहे.