जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आर्त हाक
बेडअभावी रुग्णवाहिकेतच होतोय मृत्यू
उपचाराअभावी जिल्ह्यातील शेकडो लोक दगावले
सर्व रुग्णालयांचे उंबरठे झिजवून देखील मिळेना बेड
मृत्यू दराची कागदोपत्री टक्केवारी बनली संशयास्पद
कृष्णात चौगले / कोल्हापूर
पन्हाळा तालुक्यातील सुळे गावातील एका 65 वर्षीय महिलेला अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला. शरीरातील ‘ऑक्सीजन लेवल’ 70 पर्यंत खाली आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पन्हाळा येथील एकलव्य कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 108 रुग्णवाहिकेतून त्यांना एकलव्य कोविड सेंटरमध्ये नेले. पण तेथे बेड शिल्लक नसल्याचे सांगून त्यांनी सीपीआर हॉस्पिटलचा मार्ग दाखवला. सीपीआरमध्येही बेड उपलब्ध नसल्यामुळे बेडच्या शोधार्थ पुन्हा रूग्णवाहिकेचा प्रवास सुरु झाला. सर्व रुग्णालयाचे उंबरठे झिजवून देखील रात्री साडेदहा वाजेपर्यंत ‘त्या’ महिलेला ऑक्सीजनेटेड अथवा आयसीयु बेड मिळाला नाही. अखेर रात्री अकरा वाजता रुग्णवाहिकेतच तीने जगाचा निरोप घेतला. या घटनेतून तोकडय़ा आरोग्य यंत्रणेचे भिषण वास्तव समोर आले असून ‘कोणी बेड देता का बेड ?’ असा आर्त सवाल करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
सुळे गावातील ही घटना प्रातिनिधीक स्वरुपाची असली तरी अशा पद्धतीने दररोज अनेक रुग्ण बेडअभावी दगावत आहेत. पण रुग्णालयाबाहेरच ज्या रुग्णांचा मृत्यू होत आहे, त्यांची नोंद प्रशासनाच्या ‘डेथ रेट’मध्ये होत नाही. ही नोंद झाल्यास कोरोना बळींची आकडेवारी 20 टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. यामधील सुमारे 18 ते 20 टक्के रुग्ण श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतरच रुग्णालयांचा शोध घेत असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनेटेड आणि आयसीयु बेडची गरज भासत आहे. पण जिल्ह्यात केवळ 1335 ऑक्सीजनेटेड बेड असून 320 आयसीयु बेड आहेत. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने रुग्णालयात दाखल होण्यासाठी येणार्या सर्वच अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळणे अशक्य झाले आहे. ‘श्वास’ गुदमरलेल्या अवस्थेत सर्व रुग्णालयांचे उंबरठे झिजवून देखील बेड मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेत आहेत.
कोरोनाची लक्षणे, त्याचे गांभिर्य आणि परिणाम याबाबत ग्रामीण जनतेला आरोग्य विभागाकडून पुरेशी माहिती दिली जात असली तरी लोकांकडून त्याकडे गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडून औषधे घेतली जातात. ही औषधे घेतल्यानंतर संबंधितांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसली तरी देखील कोविडची तपासणी करण्यासाठी बहुतांशी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे आठ ते दहा दिवसानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतर रुग्णालयांची शोध मोहिम सुरु होते. या अवस्थेत रुग्णांना ऑक्सीजनेटेड अथवा आयसीयु बेडची आवश्यकता भासते. अशा वेळी रुग्णांच्या कुटूंबियांची धावाधाव सुरु होते. बेड मिळवण्यासाठी अगदी राजकीय वजनही वापरले जात आहे. पण बेड शिल्लक नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही.
ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट
एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत केवळ शहरी भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. पण ऑगस्ट महिन्यापासून ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात शिरकाव झाला. त्यामुळे आज शहरी व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचे सरासरी प्रमाण पाहता त्याची टक्केवारी समान झाली आहे. प्रत्येक गावात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिह्यातील 1030 गावांपैकी 909 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये 495 गावांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. 414 गावांमध्ये 5 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गावे ‘हॉटस्पॉट’ बनत चालली आहेत.
‘मृत्यू दर’ संशायास्पद
सध्या प्रशासनाकडून जाहीर केला जाणारा मृत्यू दर 2.8 ते 3 टक्केपर्यंत आहे. कधी 3 तर कधी 2.8 टक्के असा त्यामध्ये चढ उतार होत आहे. पण केवळ एका सीपीआर हॉस्पिटलचा मृत्यू दर 16 टक्के असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. जिह्यातील उर्वरित रुग्णालयांतील मृत्यू दर पाहता तो याच पटीत आहे. तरीही प्रशासनाकडून कागदोपत्री केवळ 3 टक्क्यांपर्यंत मृत्यू दर का दाखवला जात आहे ? असा सवाल जाणकारांतून उपस्थित केला जात आहे. मृत्यू दराची जी माहिती शासनाकडे पाठवली जात आहे, तीच माहिती जिल्हा पातळीवरील बैठकांमध्ये स्पष्ट का केली जात नाही ? हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे.
ऑक्सीजनेटेड व आयसीयु बेड खरेदीला प्राधान्य आवश्यक
जिल्ह्यात पुरेशी आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाबाधितांची कुचंबना होत आहे. उपचाराअभावी शेकडो रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भव्य कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. हा 64 कोटींचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आहे. आता या निधीतून कोविड सेंटर उभारण्याऐवजी शासकीय रुग्णालयांमधील सुविधांमध्ये वाढ केली जाणार आहे. यामध्ये ऑक्सीजनेटेड व आयसीयू बेड मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्याची गरज आहे. तरच बेडअभावी बळी जाणाऱया रुग्णांची संख्या कमी होईल.