स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास : मात्र, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा चौक ते कोल्हापूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण केले आहे. मात्र, परिसरातील पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. परिणामी आदिश्वर शोरूम परिसरात रस्त्यावर सांडपाणी साचत आहे. त्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी निर्माण झालेल्या खड्डय़ांमध्ये पाणी साचत आहे. संगोळ्ळी रायण्णा चौक ते कोल्हापूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. याकरिता रस्त्याच्या एका बाजूला गटारीसाठी पाईप घातल्या आहेत. पण दुसऱया बाजूला साचणाऱया पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच उपाययोजना राबविली नाही. सध्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, एका बाजूच्या गटारीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे आदिश्वर शोरूमसमोरील बाजूने सांडपाणी साचले आहे. या ठिकाणी रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचत असल्याने नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज
परिसरात विविध रुग्णालये असल्याने सांडपाण्यामध्ये रुग्णालयांमधील सांडपाणी मिसळत असते. साचलेले पाणी दुचाकी वाहनधारक आणि पादचाऱयांच्या अंगावर उडत असल्याने धोका निर्माण झाला आहे. पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. रुग्णालयांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीकडून आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पण अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना फटका बसत आहे. रस्त्यावर साचणाऱया पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.