जि. प. चे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून तालुक्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतशवपेटी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागात रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घरी ठेवावा लागतो. नातेवाईक, मित्रपरिवार यांना दूरचा प्रवास करून अंत्यविधीसाठी यावे लागते. अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये मृतदेह घरी ठेवावा लागतो. जास्त कालावधीसाठी मृतदेह ठेवल्यास घरी व परिसरात जंतुसंसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या परिस्थितीत मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीतशवपेटीचा वापर होणार आहे. या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजना घेण्यात आली होती.
शीतशवपेटी जिल्ह्यातील पुढील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. आजरा- उत्तुर, भुदरगड- कडगाव, चंदगड- कोवाड, गडहिंग्लज- हलकर्णी, हातकणगंले – पुलाची शिरोली, हुपरी, भादोले, सावर्डे, पट्टणकोडोली, गगनबावडा – निवडे, पन्हाळा – कळे, शाहुवाडी- बांबवडे व भेडसगांव, शिरोळ- जयसिंगपूर व कुरूंदवाड, करवीर – इस्पुर्ली, कागल – कापशी.
या योजनेच्या मंजुरीसाठी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील व आरोग्य समितीचे सदस्यांचेही सहकार्य लाभले. या शीतशवपेटींचा जनतेने वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.