महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा कर्मचाऱ्यांना आदेश
कोल्हापूर / प्रतिनिधी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या केवळ कागदावर मान्य करणाऱ्या राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही फसवणूक असून जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. उलट आंदोलानाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा देत राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आपापल्या जिल्हय़ात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाडय़ा आडावा, असा आदेश राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला आहे.
किमान वेतनाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) वतीने येथील ऐतिहासिक बिंदू चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलाच्या चौथ्या दिवशी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ, रत्नागिरी अध्यक्ष संजय घोसाळे यांच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी जिल्हय़ातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 1 जानेवारीपासून बिंदू चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूर, दुसऱ्या दिवशी सांगली, तिसऱ्या दिवशी सातारा आणि चौथ्या दिवशी रत्नागिरी जिल्हय़ातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. सरचिटणीस नामदेव चव्हाण यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. जो पर्यंत मागण्याची पूर्तता आणि अंमलबजावणी होत नाही, पर्यत महासंघाने जो कार्यक्रम दिला आहे, त्यानुसार आपापल्या जिल्हय़ात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांच्या गाड्य़ा आडवाव्यात, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
मंगळवारच्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. किरण पांचाळ यांनी केले. ते म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मऱ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा न घेता तातडीने मागण्या मान्य कराव्यात, त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवली जाईल. आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्हा नेते कृष्णा होडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ, रत्नागिरीचे अध्यक्ष संजय घोसाळे, चिपळूणचे अध्यक्ष महेश राजेशिर्के, राज्य संघटना सदस्य संदीप हरियाण, खेडचे अध्यक्ष हरिश्चंद्र बाचिम, राजापूरचे अध्यक्ष चंद्रकांत तिर्लोटकर, दापोलीचे अध्यक्ष कॉ. पडयाळ, लांजाचे अध्यक्ष शंकर कांबळे, मंडणगडचे अध्यक्ष कॉ. निकम यांनी सहभाग आंदोलनात सहभाग घेत पाठबळ दिले. यावेळी कॉ. बाळासाहेब बरगे, अनिल चव्हाण, रघुनाथ कांबळे, संतोष जाधव, सतिश्चंद्र कांबळे, सम्राट मोरे, कॉ. दिलीप पवार, सुभाष पाटील सम्राट मोरे आदी उपस्थित होते.