जिल्ह्यात पुरेशा लससाठी केंद्र सरकारकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील पूरबाधित पावणे दोनशे गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख व राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच जिह्यासाठी पुरेशा प्रमाणात व निरंतर लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आवटे म्हणाले, कोल्हापूर जिह्यातील कोविडची परिस्थिती गंभीर नाही. कोल्हापूरचा साथरोगाचा आलेख राज्याच्या तुलनेत एक महिन्याने उशिरा सुरु होतो. त्याचा उतरण्याचा काळ ही राज्याच्या तुलनेत एक महिना उशिरा आहे. त्यामुळे इथे गंभीर असे काही नाही. जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. येथील रुग्ण बाधितांचा टक्का ही टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. 10 टक्के पेक्षाही कमी आहे. त्यामध्येही आता उतरते प्रमाण दिसत आहे. कोरोनामुळे शेकडा मृत्युचे प्रमाण 2.9 टक्के होतो, ते आता 2.6 टक्केवर आले आहे. एकंदरीत हे प्रमाण कमी होत असून समाधानकारक चित्र आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती पाहता पूरबाधित पावणे दोनशे गावांमध्ये वेगाने लसीकरण करुन ते शंभर टक्के पूर्ण करावे असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. गेल्या महिन्याभरात झालेल्या मृत्त्युचे सुक्ष पध्दतीने विश्लेषण करुन त्यामध्ये काय करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून सर्व बाजूंनी प्रयत्न झाले आहेत. यामध्ये रुग्ण शोधण्यापासून त्यावर उपचार व मृत्यु टाळणे यावर भर देण्यात आला आहे.