रब्बीतील ज्वारी उत्पादनात यंदा होणार वाढ : शेतकऱ्यांतून समाधान
सागर लोहार / व्हनाळी
महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू किंवा पर्जन्य आधारित आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. दरवर्षी मका व गहू पिकावर रब्बीत विविध रोगांचा व अवकाळी पावसाचा प्रादुर्भाव होत असल्याने कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मका व गहू पिकाचा पेरा कमी करून बहुतांश सरासरी ज्वारी पिकालाच पसंती दर्शवली आहे. ज्वारी खाण्यासाठी लाभदायक व बाजारपेठत देखील ज्वारीला अपेक्षित भाव मिळत असल्याने यंदा ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यावर्षी रब्बीत मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. शिवाय यंदा रब्बीच्या पेऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे. यावर्षी शेतीसाठी अपेक्षीत पर्जन्यमान झाले आहे. त्याचेच हे फलीत असल्याचे शेतकरी सांगत आहे. रब्बीच्या पेऱ्यात यंदा वाढ झाली आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. पावसाने खरिपात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सुरूवातीपासून रब्बी पेरणीसाठी कंबर कसुन उपलब्ध पाण्याचा कसा पुरेपूर फायदा घेता येईल या पध्दतीने रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.
पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके देखील जोमात आहेत. मागील अनेक वर्षापासून शेतकरी ज्वारी पिकाकडे पाठ फिरवत होते. त्यामुळे या भागात ज्वारीचे पिक कमी झाले होते. शिवाय ज्वारी विकत घ्यायची झाल्यास बाहेरून अधिक पैसे देऊन ज्वारी आयात करावी लागत असत. शेतकरी मागील दोन वर्षापासून निसर्ग साथ देत असल्याने रब्बीत भरघोस उत्पादन घेत आहे. शिवाय शेतकरी दरवर्षी रब्बीतील गहु व मकाचा पेरा वाढवत असतो. यंदा मात्र गव्हाचे व मकाचे उत्पादन कमी करुन शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा पेरा वाढवला आहे.
लवकर पेरणी केलेल्या ज्वारीला आता कणसे येवून त्यामध्ये ज्वारीचे दाणे भरत आहेत. या ज्वारीच्या कणसातील दाणे टिपण्यासाठी आकाशात पिरणा-य़ा पक्षांचा नजरा या ज्वारीकडे लागल्या आहेत. पहाटे सकाळच्यावेळी पाखरांचे थवे हे ज्वारीच्या कणसातील दाणे खाण्यासाठी येतात. सायंकाळी व सकाळी अशा वेळेतच पक्षी ज्वारीचे दाणे खातात दुपारी भर उन्हामध्ये पक्षांचे थवे येत नाहीत. त्यामुळे दुपारी पिकाची राखण करावी लागत नाही.
शेतकरी ज्वारी पक्व होईपर्यंत राखण करीत असतो. यंदा मात्र ज्वारी पिकावरील पक्षांची राणख करण्यासाठी बुजगावणे, प्लास्टीक पट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी जमिनीत ज्वारीची पेरणी जास्त केली आहे तसेच उत्पादन देखील चांगले मिळण्याची अपेक्षा शेतक-यांना वाटत आहे.शिवाय ऊस तोडणी नंतर जनावारांच्या वाळ्या चा-याचा प्रश्नही सुटत असल्याने दोहेरी फायदेशीर असलेल्या ज्वारी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
हमखास उत्पादन यावर्षी पर्जन्यमान चांगले होते. त्यामुळे ऊसातून अंतरपिक व माड्या शेतात ज्वारी पिकाची पेरणी केली. सध्या ज्वारीचे पीक जोमाने आले असून कनसेही भरली आहेत. लवकरच ज्वारीची काढणी होईल . इतर पिकाच्या तुलनेत ज्वारी पिकातून हमखास उत्पादन मिळेल. अशोक पांडूरंग पाटील, शेतकरी साके |