सुरेश पाटील / पुलाची शिरोली
महामार्गावर पाणी ओसरल्याने तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर महामार्गावरील वहातुक सोमवारी सुरु झाली. पोलिस प्रशासनाने रस्ता योग्य असल्याची खात्री करुनच वाहतूक सुरु केली. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर पुण्याहून कोल्हापूरकडे येणाऱ्या रस्तावरील पाणी कमी झाल्याने सोमवारी सकाळी साडेदहा वाजता प्रथम अवजड वहानांची वाहतूक सुरु करुन त्यानंतर अत्यावश्यक वहाने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली.
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून रस्तावर पोकलँड व जेसीबीच्या सहाय्याने प्रथमतः प्रात्यक्षिक घेऊन रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री झालेनंतर वहातुक सुरु करण्यात आली. सुरुवातीला कोल्हापूर शहराला पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. असल्यामुळे महानगर पालिकेचे पाण्याचे टँंकर पाठविण्यात आले. यानंतर पेट्रोल , डिझेलचे टँकर, गँस सिलेंडरचे ट्रक व गोकुळचे टँकर पाठविण्यात आले. त्यानंतर अत्यावश्यक असलेले माल वहातुकीची वहाने क्रमाक्रमाने सोडण्यात आले. प्रवाशी एसटी बस, खाजगी बसेस व कार गाड्या सोडण्यात आलेल्या. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर कडून येणारी सुमारे एक हजार वाहने सोडली.
आमदार विनय कोरे हे कोल्हापूरला जाण्यासाठी सांगली फाटा येथे येऊन थांबले होते. अवजड वाहनांची वाहतूक सुरू होताच त्यांनी आपली फॉर्च्युनर कार त्यांच्या पाठोपाठ घुसडून संधी साधली.
दरम्यान शुक्रवार पासुन महामार्ग बंद असल्याने शेकडो वाहने रस्तावर थांबून होती. या थांबून राहिलेल्या वहानधारकांना जेवण पाण्याची व्यवस्था सामाजिक संस्थाकडुन सुरु होती. यामध्ये माजी आमदार अमल महाडिक व व्यापारी लोकांच्या वतीने उमा भवन येथे. मुस्लिम समाजावतीने मदरशामध्ये अनेकांना रहायची व जेवनाची व्यवस्था केली होती. तर नागांव येथील आंबेडकर नगर मधील सिद्धार्थ समुहाचे वतीनेही जेवण वाटप करणेत आले.
पुलाची शिरोली व हालोंडी या हातकणंगले तालुक्यातील तर शिये या करवीर तालुक्यातील रहिवासी वस्तीतील पाणी ओसरल्याने घरातील साफसफाई करण्यात नागरीकांनी सोमवारी सुरुवात केली आहे.