अधीक्षकांचा जिह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना दम , अनेकजण बदली होऊनही तीन वर्षांपासून तळ ठोकून
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
बदली होऊनही दोन ते तीन वर्षे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱयांना त्वरित कार्यमुक्त करावे. अन्यथा त्यांच्यासोबत ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱयांचे नोव्हेंबर 2020 चे वेतन तहकूब करण्यात येईल, असा सज्जड वजा दम आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे. त्यामुळे बदली होऊनही ठाण मांडलेल्या मर्जीतील पोलिसांना रिलीव्ह करण्याबाबत जिह्यात एकच धांदल उडाली आहे.
ज्या पोलीस कर्मचाऱयांची एकाच ठाण्यात सहा वर्षांपेक्षा जास्त सेवा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा कर्मचाऱयांची यादी तयार करुन त्यांची बदली हवे असलेल्या ठिकाणी करण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घेतला होता. तरीदेखील काही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱयांनी बदली झालेल्या कर्मचाऱयांना सोडलेले नाही. हा गंभीर प्रकार अधीक्षक बलकवडे यांच्या निदर्शनास आला. 2018 ते 2020 मध्ये बदली झालेल्यापैकी अनेक जण ठाण्यात ठाण मांडून आहेत. त्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे. संबंधित ठाण्याच्या अधिकाऱयांनी त्यांना कार्यमुक्त करावे. लेखा शाखेला याबाबत कळवावे, अन्यथा कर्मचाऱयांसह प्रभारी अधिकाऱयांचे नोव्हेंबर 2020 चे वेतन तहकूब करण्यात येईल, असा आदेश बिनतारी संदेश यंत्रणेद्धारे जिह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱयांना देण्यात आला आहे.
बदली होऊन एलसीबी, डीबी पथकात कार्यरत
बदली झालेले कर्मचारी प्रभारी पोलीस अधिकाऱयांच्या मर्जीतील असल्याने त्यांना अद्यापही सोडण्यात आले नव्हते. तसेच बदली होऊनही मर्जीतील कर्मचारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यात कलेक्टर, गुन्हे शोध पथकात (डीबी) काम करीत होते. त्याबद्दल जिल्हा पोलीस दलात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा होत होती.
बदली करण्याच्या हेतूला तिलांजली
बदलीचा हेतूच कर्मचारी एका ठिकाणी अनेक दिवस ठाण मांडून बसू नये, हा असतो. पण बदली होऊनही कर्मचाऱयांना रिलीव्ह न केल्याने या हेतूचा सोयीस्कर विसर पडल्याची चर्चा पोलीस दलात सुरू होती. या चर्चेला अधीक्षक बलकवडे यांच्या वेतन तहकुबीच्या आदेशाने पूर्णविराम मिळणार आहे.