सुधाकर काशीद / कोल्हापूर
कोल्हापुरात काल रात्री सुतारमळा परिसरात गव्यांचा कळप आला. आता आम्ही चहा घेता घेता चर्चा करणार “गवा नागरी वस्तीत आला. नागरिक भयभीत. वनखाते झोपले आहे काय” अशी सणसणसीत टिका करणार. ही टिका करताना गवा नागरी वस्तीत का आला याचे नेमके कारण बाजुला ठेवून विश्लेषण करणार. आम्हीच वन्य जीवांना अनेक कारणाने डिस्टर्ब केले आहे हे मात्र विसरणार…
बर झाल, काल गव्याचा कळप रात्रीच्या वेळी आला. दिवसा आला असता तर आम्ही त्यांच्या मागे लागलो असतो. गव्यांना पळवून पळवून दमवले असते. गवा पुढे हतबलतेने पळतोय आणि आम्हीही त्यांच्या मागे हुर्रे करत झुंडीच्या झुंडीने पळतोय. असच घडल असतं. गवा दिसायला धुडच्या धुड पण त्याच काळीज सशासारखं इवलसं त्यामुळे पळून पळून गवा निपचीत पडला असता. माणसांच हे कॉक्रिटच जंगल किती भयानक रे बाबा म्हणत त्याने प्राण सोडला असता. मग आम्ही शाहूस्मारक भवनात एक परिसंवाद ठेवला असता. “गवा, माणूस, पर्यावरण, जंगल.” असा त्याचा बौद्धिक विषय ठेवला असता. त्याच त्या तज्ञांनी मग व्यासपीठावर किस पाडला असता. परिसंवाद संपला की आम्ही आपापल्या घरी गेलो असतो अणि पुन्हा कधी “आमच्या” नागरी वस्तीत गवा आला की पुन्हा हुर्रे करायला आम्हीच नक्की पुढे असतो…