प्रतिनिधी/वारणानगर
येथील वारणा उजव्या कालव्यात बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील गाव विहरीजवळील कालव्यात आज सायकांळी पाच वाजता मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे वारणानगर, बहिरेबाडी ग्रामस्थांना मगरीपासून धोका पोहचू शकतो यासाठी नागरिकानी सावधानता बाळगावी असे आवाहन सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी केले आहे.
वारणा उजव्या कालव्याची खुदाई होऊन गेली कित्येक वर्ष काम अपूर्ण राहिले आहे. या खुदाई केलेल्या कालव्यात पावसाळ्यात पाणी साठले जाते. कोडोली गावा बाहेरून आलेला हा कालवा वारणेच्या कॉलेज गेट व व्यापारी लाईन जवळून बहिरेवाडी गावाला लागून अमृतनगर पर्यन्त गेला आहे. नागरी वस्तीला लागून कालवा जात असल्याने तसेच नागरिकांचा कायम वावर असल्याने नागरिकांना या मगरीपासून धोका पोहचणार असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
वारणा नदीच्या पात्रात मोठ्या संखेने मगरीचा कायम वावर असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेने आपले शेतातील काम तसेच नदीपात्रातील विद्युत पंपाची कामे करावी लागतात. वारणा नदी काठला सातवे ता. पन्हाळा येथील शेतकऱ्यावर नदीपात्रात केलेल्या मगरीच्या हल्ल्यातून तो शेतकरी अद्याप उपचार घेत आहे तो पर्यन्त बहिरेवाडीत गाव विहरीला लागूनच असलेल्या वारणा कालव्यात मगर दिसल्याने मगर नागरी वस्तीतच आल्याचा प्रकार घडला असून वन विभागाने वारणा कालव्यात शोध मोहीम राबवून मगरीस पकडावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.