केवळ 11 टक्के क्षेत्रावर पेरा, अतिवृष्टीचा परिणाम
प्रतिनिधी / कोल्हापूर
खरीप पिकांच्या ऐन काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने सुगी लांबणीवर पडली याचा विपरीत परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला आहे. ऑक्टोबर संपला तरी केवळ अकरा टक्केच पेरण्या झाल्या आहेत. रब्बीच्या 22 हजार 60 हेक्टरपैकी 3 हजार 259 हेक्टरवर ज्वारी, हरभरा, गहू पेरणी झालेली असून उगवण क्षमता समाधान कारक आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
ज्वारीसाठी 11 हजार 708 हेक्टर क्षेत्र
जिल्ह्यात रब्बी ज्वारीसाठी 11 हजार 708 हेक्टर क्षेत्र निर्धारीत केले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या अठवडÎा पर्यंत 1780 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली तर गहू पिकासाठी 1745 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी 12 हेक्टरवर पेरा झालेला आहे. हरभऱयासाठी 4528 क्षेत्र लक्षांक ठेवण्यात आला होता. 327 हेक्टरवर पेरणी झाली. आहे. उर्वरीत क्षेत्रावर महिन्या अखेर पेरण्या पूर्ण होतील.
15 हजार55 हेक्टरवरअडसालीलागण
जिल्ह्यात 1 लाख 58 हजार 930 हेक्टर वर उसाचे निर्धारित क्षेत्र आहे. त्यापैकी 1 लाख 57 हजार 752 हेक्टरवर सध्या लागवड झालेली आहे. सर्वच क्षेत्रातील उसाची वाढ समाधानकारक असून गळीत हंगामाला सुरवात झाली असून पक्व उसाची तोडणी सुरु आहे. मजुरांची टंचाई असल्याने मशीनद्वारे तोडणी सुरवात झाली आहे. 15 हजार 55 हेक्टरवर अडसाली लागण झाली आहे. पूर्व हंगामी लागणीला अतिवृष्टीमुळे खंड पडला होता. सध्या पावसाने उघडीप दिल्याने त्याही लागणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 1782 हेक्टरवर लागण झाली आहे. उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जनजागृती केली जात आहे.
उगवणीच प्रत चांगली
पावसामुळे हंगाम लांबला तरी जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहे. त्यामुळे पेरण्या उशिरा होत असल्या तरी उगवण क्षमता चांगली आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱयांना मार्गदर्शन केले जात आहे.
-चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर