महाराष्ट्रासह आठ राज्यात चाचणीला केंद्राची परवानगी, जनक, बीएसएस-793 जाती विकसित
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
केंद्र सरकारने नुकतेच बीटी वांग्याच्या प्रत्यक्ष परीक्षण आणि चाचण्यावरील बंदी मागे घेतल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकर्यांना हक्काचे उत्पादन घेता येणार आहेच तर खवय्यानाही स्वच्छ वांग्याची चव चाखायला मिळणार आहे. जेनेटिक इंजीनियरिंग अप्रेजल कमिटीने भविष्यात व्यवसायिक उत्पादन व पुरवठा होण्यासाठी हे पाहून उचलले आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह आठ राज्यात ही चाचणी होणार आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्चच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन प्लांट बायोटेक्नॉलॉजी’ यांनी वांग्याचे ‘जनक’ आणि बीएसएस-793’ मध्ये बीटी कॅरी 1 जीन (इव्हेंट 142) हे वाण विकसित केले आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या 2002 पासूनच्या लढय़ाला यश आले आहे.
आठ राज्यात प्रायोगिक चाचणी
मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, ओरीसा, पश्चिम बंगाल या आठ राज्यात 2020 ते 23 दरम्यान बीटी वांग्याच्या प्रत्यक्ष चाचणीना परवानगी दिली आहे. या आठ राज्यातील सरकारांनी आक्षेप नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चाचणी घेण्यासाठी अर्ज केलेल्या बीजशितल रिसर्च जालना यांनी शेतातील प्रत्यक्ष प्रयोगासाठी जबाबदार घेतली आहे. या प्रकारे चाचणी घेतल्यावर आलेले निष्कर्ष राज्याच्या व स्थानिक पंचायतीच्या जैवविविधता मंडळाला कळवल्यानंतर देशातील सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱयांना बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
बीटी वाण पूर्णतः सुरक्षित
काही शेतकरी संघटनांनी यास विरोधही केला आहे. मात्र या बियांणांमुळे पर्यावरण, शेतकरी, माती यांना धोका असल्याचे आरोप शेतकरी संघटानांनी केला आहे. मात्र बीटी वांगे विकसित करणार्या संशोधकांनी असा कोणताही धोका होणार नसून, हे वाण अत्यंत सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. या वांग्यावरील अळी मारण्यासाठी येणारा खर्च वाचेल व वांगी सुरक्षित राहिल्याने शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल व खाणार्यांना किडीसाठी जंतुनाशक न वापरलेले वांगे मिळेल. असा दावा केला आहे.
बीटी कापसामुळे मिळाले बळ
सध्या कपाशीच्या शेतात बीटी कापसाची लागवड सुरु आहे. रासायनिक तणनाशक सहनशील बियाणांची म्हणजेच जीएम कापसाची लागवड अनेक शेतकऱयांनी करून उत्पादन खर्च कमी येतो व उत्पादनही वाढते हे सिद्ध केले आहे. गेली 18 वर्षे देशात पिकत असलेल्या अशा कापसापासून बनलेल्या सरकीचे तेल वापरणार्यांना व त्याची पेंड खाल्ल्याने जनावरांना व दूध वापरल्याने माणसांना कोणताही त्रास, अपाय झालेला नाही. या धर्तीवरच बीटी वांग्याच्या चळवळीला बळ मिळाले आहे.
काय आहे बीटी वाण
बीटी म्हणजे एक जनुक आहे. फळ पोखरणार्या आळीपासून पिकाचे रक्षण करते. आळी ज्यावेळी फळ किंवा पान खाण्यास येते तेव्हा पहिल्याच घासात पान, फळाचा काही भाग किडीच्या घशात अडकतो. अशा वेळी त्या किडीला दुसरा घास खात येत नाही. त्यामुळे पोट भरल्याचा भास होता आणि अन्नाविना ती किड जागीचे मरते. कपासाच्या बोंड आळीवर हा प्रयोग सध्या होत आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकऱयांच्या आशा उंचावला
राज्यातील शेतकरी कष्टाळू आहे. चांगला, स्वच्छ भाजीपाला ग्राहकांना देण्याकडे त्याचा नेहमी कल असतो. मात्र वातावरणातील प्रदुषणामुळे 20 ते 25 टक्के भाजीपाला खराब होतो. बीटी वांग्यच्या माध्यमातून शेतकर्यांचे नुकसान टळणार आहे. दिवंगत अजित नरदे यांनी याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. – संजय कोले, सहकार आघारी राज्य प्रमुख, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना