प्रतिनिधी / कुरूंदवाड
शिरोळ येथे शेतातील मोटर काढत असताना तराफावरून वाहून जाणार्यां पाच युवकांना वाचवण्यात वजीर रेस्क्यू फोर्स व अन्य लोकांच्या मदतीने यश आले. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. शिरोळ तालुक्यातीळ गणेशवाडी येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे म्हैसाळ हद्दीत आहे. सध्या कोयना धरणातून विसर्ग चालू असल्याने गणेशवाडी येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. यामुळे गणेशवाडी येथील दीपक वास्कर, महेश कदम, राहुल गौरवाडे, उत्कर्ष खोत आणि वैभव वास्कर हे त्यांच्या म्हैसाळ हद्दीतील शेतातील इलेक्ट्रिक मोटारी काढण्यासाठी गेले होते.
श्रावण सोमवार असल्याने गणेशवाडीची नाव पूजेसाठी काठाला आणली होती. यामुळे या युवकांनी 6 रिकाम्या प्लॅस्टिकच्या बॅरेलच्या तराफावरून मोटर काढण्यासाठी गेले. यावेळी पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तराफा वाहून जाऊ लागला. प्रसंगावधान राखून यातील एकाने वजीर रेस्क्यू फोर्सच्या रौफ पटेल याला व्हिडिओ कॉलवरुन ही हकीकत सांगितली. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्स टीमने कुरुंदवाड घाट येथील आपत्तीकालीन यांत्रिक बोट काढून ताबडतोब नदीतून गणेशवाडीकडे कूच केली. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन या टीमने प्रथम शिरटी गावाच्या आसपास त्या तराफावरील युवकांना गाठले आणि गौरवाड पाणवठा येथे सुखरूप नदीकाठावर आणले. यावेळी त्या युवकांना मदत करण्यासाठी वजीर रेस्क्यू टीम बरोबर सामाजिक कार्यकर्ते दादे पाशा पटेल तसेच अन्य युवक उपस्थित होते.
दरम्यान, या युवकांना वाचवण्यासाठी यांत्रिक बोटेची व्यवस्था होईपर्यंत नृसिंहवाडी येथील लाकडी नावेचे नावाडी अरुण गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना लाकडी नाव प्रवाहात सोडण्यास सांगितली. जीव धोक्यात घालून ही नाव उलट प्रवाहात औरवाड पुलाकडे आणण्यात आली होती. ह्या नावे मध्ये दोरखंड लाईफ जॅकेट आदी आपत्ती निवारणाचे साहित्यही घेण्यात आले होते. पण यांत्रिक बोटीने हे काम हलके केले. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा थरार सुरू होता. अखेर एकच्या दरम्यान गौरवाडपाणवठा येथे या युवकांना नदीकाठावर सुखरूप आणले गेले.
यावेळी त्या युवकांनी रेस्कु फोर्सने जीवाचे रान करून वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. दरम्यान, गणेश वाडी वरून तराफा वरून युवक वाहून गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि औरवाड नवीन पुलावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.