सातारा जिल्हय़ाचा निकाल 97.25 टक्के : निकाल 18 टक्क्यांनी वाढला
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या आगमन झाले आणि त्यातच दहावीची परीक्षा उरकली गेली. यामध्ये भुगोलचा पेपरही रद्द करण्याची वेळ आली होती. त्यापुढे सलग कोरोनाविरुध्दची लढाई सुरु असतानाच कोरोनासह इतर अडचणीवर मात करत पेपर तपासले गेले आणि बुधवारी दुपारी 1 वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सातारा जिल्हय़ाचा एकूण निकाल 97.25 टक्के एवढा लागला आहे. जिल्हय़ाने निकालात कोल्हापूर विभागीय मंडळात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 3 मार्च ते दि. 23 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा आयोजित केलेली होती. सातारा जिल्हय़ातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची दहावीची परीक्षा केंद्रे 116 होती. कोल्हापूर मंडळात प्रथम क्रमांक कोल्हापूर जिल्हय़ाचा निकाल 98.21 टक्के, द्वितीय क्रमांक सातारा 97.25 टक्के, तर तृतीय क्रमांकावर सांगली जिल्हय़ाचा निकाल 97.22 टक्के असा आहे.
जिल्हय़ाचा टक्का वधारला
बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही सातारा जिल्हा दुसऱया स्थानी आहे. सातारा जिल्हय़ातील 2019 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा सातारा जिल्हय़ाचा निकाल 86.23 टक्के असा होता. तर यावर्षी सातारा जिल्हय़ातील फेब्रुवारी-मार्च 20 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ठ संख्या 39784 एवढी होती. त्यापैकी उत्तीर्ण संख्या-38688 अशी असून जिल्हय़ाचा निकाल 97.25 टक्के एवढा आहे. सातारा जिल्हयातील दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण मुलांची संख्या 20 हजार 323 (96.24 टक्के) अशी आहे. तसेच एकूण उत्तीर्ण मुलींची संख्या 18 हजार 365 (98.38 टक्के) अशी आहे.
सातारा जिह्यातील 39 हजार 784 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 38 हजार 688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अव्वल श्रेणीत 17 हजार 15, प्रथम श्रेणीत 13 हजार 543 तसेच द्वितीय श्रेणीत सहा हजार 828 विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच एक हजार 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सातारा जिल्हयाचा रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 72.86 टक्के इतका आहे. दरम्यान, निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी व पालकांनी मोबाईलवर त्यांचे निकाल मिळवले. लॉकडाऊनमुळे इंटरनेट कॅफे बंदच होते. मिठाई दुकाने बंद असल्याने अनेकांना पेढे मिळण्याची गैरसोय झाली.
रिचेकिंग प्रक्रिया लगेचच सुरु
’गैरमार्गाशी लढा’ या अभियान जिल्हयात राबविले होते. त्यामुळे जिल्हयात कॉपी प्रकरणांची संख्या निम्मयावर आली असून मार्च-20 परीक्षेत 16 गैरमार्ग प्रकरणे आढळली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱया दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होईल.
निकालात मुलेंची बाजी
मुलांपेक्षा मुलीच हुश्शार असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी 21,116 मुले व 8668 मुले बसले होते. त्यापैकी 20323 मुले तर 18365 मुली पास झाले आहेत. म्हणजेच 96.24 टक्के मुले तर 98.38 टक्के मुली परीक्षेत पास झाल्या आहेत.
इंग्रजी, गणिताची नाही आम्हा भीती
पूर्वी इंग्रजी व गणित म्हटले अंगावर काटा उभा रहायाचा. पण आता हे विषय मुलांसाठी खूपच सोपे झालेले आहेत. कोल्हापूर बोर्डात इंग्रजीमध्ये 99.58 टक्के मुलं पास झाली आहेत. तर 97.45 टक्के विद्यार्थ्यांनी सहजरित्या आयुष्याचे गणित सोडवले आहे.
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
जावली 98.21
कराड 97.42
खंडाळा 97.99
खटाव 97.65
कोरेगाव 96.92
माण 97.97
महाबळेश्वर 98.47
फलटण 94.56
पाटण 96.75
सातारा 97.62
वाई 98.26
चौकट पान 1 ला वापरणे (फोटो शिवानी तांदळे)
सर्व विषयात 35 गुण मिळवणारी शिवानी
सातारा जिह्यातील फलटण येथील आचार्य बाळशास्त्राrr जांभेकर विद्यालयाची शिवानी महादेव तांदळे या विद्यार्थीनीने सर्वच विषयात 35 गुण मिळवले आहेत. 35 गुण मिळवून एक प्रकारे या मुलीने विक्रमच केला आहे. रविवार पेठ मच्छी मार्केट येथे राहत असलेल्या शिवानी हिच्या वडिलांचा चिकनचा व्यवसाय आहे. मोठा भाऊ वडिलांना मदत करतो तर आई घरकाम करते. दरम्यान, त्या मुलीला सर्वच विषयात 35 गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत. बुधवारी (दि. 29) दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी असलेल्या मुलीने मॅजिक फिगर गाठत सर्व विषयांत 35 गुण मिळवले आहेत. अशा अनोख्या निकालामुळे या मुलीची पंचक्रोशीत वाहवा होत आहे.