कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडेंना निवेदन, कोविडच्या संकटात सहाय्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद असलेला व्यापार आणि व्यवसाय यामुळे व्यापारी आर्थिकदृष्टÎा प्रचंड अडचणीत आला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी 2021-2022 या आर्थिक वर्षातील घरफाळा पूर्णपणे माफ करण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजने महापालिकेकडे केली आहे. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, कापड व्यापारी असोसिएशनचे संपत पाटील उपस्थित होते.
महापालिका प्रशासकांना दिलेल्या निवेदनील आशय असा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी तीन महिने व यावर्षी अडीच महिने असे पाच ते सहा महिने लॉकडाऊनमुळे व्यापार बंद आहे. 2021-22 चे आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या प्रारंभीच लॉकडाऊन लागू झाला. दुकाने पाच महिने बंद असल्याने व्यापारी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सर्व व्यापाऱयांना आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षातील घरफाळा माफ करावा. कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीतप्रमाणे कोल्हापूर शहरातील पाणीपट्टीमध्ये करण्यात आलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी. परवाना नुतनीकरण करुन घ्यावयाची मुदत दि. 30 जून 2021 पर्यंत वाढवून दिली आहे.
सध्या 90 टक्के आस्थापने बंद आहेत. तेंव्हा परवाना नुतनीकरण करुन घेणे शक्य नाही. त्यामुळे परवाना नुतनीकरणाची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवून मिळावी. परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, परवाना नुतनीकरण मुदत संपल्यानंतर करण्यात येणारी 15 टक्के व 20 टक्के दंड आकारणी रद्द करावी. कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या कोरोना संबधीत सर्व नियमांचे आजपर्यंत कठोर पालन केले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पॉझिटिव्ही रेट जिल्ह्यापेक्षा बराच कमी आहे. सध्याच्या लॉकडाऊनला दोन महिने उलटून गेले असल्यामुळे व्यापारावर फार मोठा परिणाम होऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच डबघाईला आली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सह सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत उघडण्यासाठी परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालिकेने व्यापारी, उद्योजकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने परवाना फी व फायरसेसमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. ही वाढ चुकीची व अन्यायी असल्याने तत्काळ मागे घ्यावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत व्यापारी, उद्योजक परवाना नूतनीकरण करणार नाहीत.
– संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज