नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आश्वासन, हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी संवाद
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. हद्दवाढ करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्री शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. मंगरायाचीवाडी येथील दिलीप मोहिते यांच्या हेलिपॅडवर त्यांची हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. गेली चार दशके एक इंचही हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूर विकासाच्या प्रक्रियेत मागे पडत असल्याची व्यथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, ऍड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई आदींनी व्यक्त करत काहीही झाले तरी हद्दवाढ करा अशी आग्रही भूमिका मांडली.
या वर्षीच्या प्रारंभी जानेवारीत मंत्री शिंदे कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रस्ताव तयार करून तो नगरविकास विभागाकडे पाठविला होता. दरम्यानच्या काळात कृती समितीच्यावतीने ऍड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याशी संवाद साधत हद्दवाढीच्या समर्थनार्थ जनमत तयार करण्याचे काम केले. आर. के. पोवार यांनीही बैठका घेत व्यापक जनजागृती सुरू केली. त्यानंतर अद्याप या प्रस्तावावर निर्णय झाला नसल्याने प्रस्तावावर कार्यवाही व्हावी, यासाठी शुक्रवारी कृती समितीच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंत्री शिंदे यांच्या व्यस्त दौऱयातून वेळ काढत त्यांचा मोहिते यांच्या हेलिपॅडवर कृती समितीच्या शिष्टमंडळाशी संवाद घडवून आणला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी मी विधिमंडळात उपोषण केले होते. मंत्री शिंदेसाहेबांच्या सांगण्यावरूनच मी उपोषण मागे घेतले होते. त्यावेळी हद्दवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. पण काहींचा विरोध लक्षात घेऊन हा निर्णय त्यावेळी थांबवला. आता मात्र हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, हद्दवाढीमुळे राज्यातील अनेक शहरांचा विकास झाला. ती पुढे गेली पण कोल्हापूर मांत्र मागेच राहिले. हद्दवाढ झाल्याशिवाय पायाभूत सुविधा निर्माण होणार नाही. तरूणांनाही रोजगार मिळणार नाही. त्यामुळे काहीही करा पण हद्दवाढ करा, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.
समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, चाळीस वर्षे झाली तरी कोल्हापूरला मागुनही हद्दवाढ मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. काहीही झाले तरी आता हद्दवाढीचा निर्णय घ्या. महापालिकेच्या प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठविल्याची माहिती यावेळी दिली. निवडणुकीपूर्वी सहा महिने शहराच्या हद्दीत कोणताही बदल करता येत नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कृती समितीच्या पदाधिकाऱयांना आश्वासन देताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीसाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूरवासीयाच्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. दिवाळीनंतर हद्दवाढी संदर्भात आपण मुंबई येथे मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ. हद्दवाढ करण्यात ज्या तांत्रिक अडचणी येतात त्या तांत्रिक अडचणी दूर करून कोल्हापूर शहराची हद्द व होण्याच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, बाबा पार्टे, अशोक भंडारे, क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, दुर्गेश लिंग्रस, राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदे, अनिल घाटगे, शिवसेनेचे किशोर घाटगे, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, सुरेश लिंबेकर, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, डॉ. संदीप पाटील, कॉ. सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.