भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांची निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पुलाची शिरोली / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील पुरग्रस्तांना न्याय मिळावा. भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके, जनावरे, प्रापंचिक साहित्य, व घरांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिले.
हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदी क्षेत्रात शिरोली पुलाची, हालोंडी, हेरले, रुकडी, रूई, इंगळी, पट्टणकोडोली, रेंदाळ, तसेच वारणा नदी क्षेत्रात निलेवाडी, जुने पारगाव, चावरे, किणी, घुणकी, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, हिंगणगाव, लाटवडे, कुंभोज या गावांना नदीच्या महापुराने नेहमीच मोठा फटका बसतो. त्यातच सलग दोन वर्षे कोरोना विषाणूची महामारी यासारख्या नैसर्गिक व अस्मानी संकटामुळे इथल्या नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
सदर गावातील शेतीचे व घराचे तात्काळ पंचनामे करावेत, व्यापारीघटकांसह, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये अनुदान मिळावे, शेतमजुरांना सुद्धा याची आर्थिक मदत मिळावी.याकरिता आपण शासन दरबारी प्रयत्न करून त्वरित न्याय द्यावा असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, सुरेशराव पाटील भादोलेकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, मिडिया प्रमुख ऋषिकेश सरनोबत, भादोले शाखा अध्यक्ष तानाजी पाटील व प्रताप पाटील आदी उपस्थित होते.