ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोळसा उत्पादन क्षेत्रातील सुधारणेसाठी 50 हजार कोटींची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधील काही तरतुदींची माहिती सीतारामन यांनी आज चौथ्या टप्प्यातील पत्रकार परिषदेत दिली.
सीतारामन म्हणाल्या, देशात कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात आव्हानात्मक स्थिती निर्माण आहे. त्यामुळे आपल्याला कठीण परिस्तिथीचा सामना करायचा आहे. आत्मनिर्भर पॅकेजद्वारे आपल्याला देशाला सक्षम बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. देशात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्माण करायचे आहेत. बँकिंग क्षेत्रात सुधारणा करायच्या आहेत. उद्योगधंद्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक मंत्रालयात प्रोजेक्ट डेव्हलपमेंट पथक बनवण्यात येणार आहे. तसेच गुंतवणूक वाढवणाऱ्या राज्यांचे रँकिंग करण्यात येईल.
कोळसा उत्पादन वाढविण्यासाठी 50 हजार कोटी
देशातील कोळसा उत्पादन क्षेत्रातील सुधारणेसाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. कोळशाच्या व्यावसायिक उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. कोळसा क्षेत्रातील सरकारचे अधिकार कमी करून खासगी कंपन्यांना संधी दिली जाणार आहे.
संरक्षण क्षेत्र ‘आत्मनिर्भर’ करण्यावर भर
संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अत्यावश्यक आहे. त्यासाठी संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्यावर भर देण्यात येणार आहे. काही शस्त्रांची आयात करण्यावर बंदी घालून भारतातच शस्त्रांची निर्मिती करण्यात येईल. आयुध निर्माण क्षेत्रातील ऑर्डिनन्स फॅक्टरिंचे खासगीकरण होणार नाही. तसेच संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल.
नागरी उड्डाण : 6 विमानतळांचे कामकाज पीपीपी तत्वावर देशातील हवाईक्षेत्राच्या विकासासाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील सहा विमानतळांचा पीपीपी तत्वावर विकास करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील विमानांची दुरुस्ती आणि देखभालीची अनेक कामे देशात करण्यात येणार आहेत. हवाई क्षेत्राच्या विस्तारामुळे 1 हजार कोटी रुपये वाचतील. तसेच लष्कराशी चर्चा करून हवाई क्षेत्राची व्यापकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.