31 पासून सेवा समाप्तीची नोटीस : तिसऱया लाटेआधीच निर्णय
वार्ताहर / सावंतवाडी:
कोरोनाची संभाव्या तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येईल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असतानाच 31 ऑगस्टपासून राज्यातील कोविड सेंटरमध्ये कंत्राटी म्हणून नियुक्ती दिलेल्या डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱयांच्या सेवा संपुष्टात आणण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या सप्टेंबरपासून आठही तालुक्यातील समर्पित कोविड सेंटर व रुग्णालयातील कोविड सेंटरवरमध्ये डॉक्टर व नर्सची कमतरता भासणार आहे. जवळपास 100 हून अधिक नर्स, डॉक्टर व कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कपातीची टांगती तलवार आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी सेवा दिली. सुरुवातीला तीन महिन्यासाठी नियुक्त्या दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाची पहिली लाट जानेवारी 2021 पर्यंत कायम होती. त्यामुळे राज्यातील सर्व सेंटर कायम सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट फेब्रुवारी-मार्चमध्ये काही प्रमाणात ओसरली. यावेळी बहुतांश दुर्गम भागातील सेंटर बंद करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल ते आता जुलै महिन्यापर्यंत तब्बल चार महिने कोरोनाने नागरिक हतबल झाले. अनेकांना प्राण गमवावा लागला. अशावेळी कंत्राटी कर्मचाऱयांनी उत्तम सेवा दिली. मात्र, आता 31 ऑगस्टपासून कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱयांना सेवेतून कमी करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत.
केंद्राकडून निधीच नाही
केंद्र सरकारकडून कोविडसाठी देण्यात येणारा निधी सध्या राज्याला देण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालनालयाने कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱयांच्या सेवा समाप्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात कोविड सेंटरही बंद होणार आहेत. केंद्र शासनामार्फत कोरोना अंतर्गत मनुष्यबळासाठी निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटींच्या सेवा समाप्त करून नॉन कोविडमध्ये काम करणाऱया डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱयांना कोविड सेंटरमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तिसरी लाट आल्यास काय?
अनेकजण आपल्या खासगी नोकऱया सोडून सेवेत रुजू झाले होते. त्यांच्यासमोर आता प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोना महामारीत काम केलेल्या नर्स, डॉक्टर व अन्य कर्मचाऱयांना आरोग्य सेवेत कायम करण्याचे धोरण आखले होते आणि तसे आश्वासनही दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झालीच नाही. राज्य सरकारने आरोग्यसेवा भरती जाहीर केली. त्यातही कोरोना काळात काम केलेल्या नर्स, डॉक्टर व अन्य कर्मचाऱयांसाठी आरक्षण ठेवलेले नाही. गणेश चतुर्थी कालावधीत कोरोनाचे संकट गडद असताना कर्मचाऱयांना कमी केल्याने तिसरी लाट आल्यास आरोग्य विभागात नर्स, डॉक्टर व अन्य कर्मचारी यांचा तुटवडा भासणार आहे.
100 हून अधिक कर्मचारी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड सेंटर तर कास येथे कोविड सेंटर आहे. या दोन ठिकाणी नर्स व कर्मचारी मिळून 12 जण आहेत. तसेच जिह्यात अन्य ठिकाणी मिळून जवळपास 100 हून अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एक सप्टेंबरपासून कंत्राटी कर्मचाऱयांना कमी केल्यानंतर शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱयांना डय़ुटी दिली जाणार आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले.
या कर्मचाऱयांना सेवेतून कमी करू नये. जोपर्यंत तालुक्यातील कोरोना संपत नाही, तोपर्यंत त्यांना सेवेत ठेवावे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. या कर्मचाऱयांनी शनिवारी त्यांचे लक्ष वेधले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कानी आपण ही बाब घालू, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांनी आपण आरोग्यमंत्रंच्या कानी ही बाब घालणार असून सिंधुदुर्ग जिह्यात अद्याप कोरोना संपलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांना कमी करू नये, अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.