कोकणातील कोरोना नियंत्रणात न येण्यामागे अनेक कारणे असली तरी सर्वात महत्त्वाचे कारण चाचणीसंख्येचे उद्दिष्ट न गाठले जाणे हे एक आहे.
कोविडच्या जागतिक आरोग्य संकटातून वाचण्यासाठी प्रत्येक देश हरप्रकारे प्रयत्न करत आहे. देशभरामध्ये दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत असली तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिह्यांमध्ये लाट काही ओसरताना दिसत नाही. हा रोग आटोक्यात यावा म्हणून आपत्ती नियंत्रण व साथ नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या कायद्याची सारी शक्ती प्रशासकीय अधिकाऱयांना दिलेली आहे. अधिकारी आपापल्या परीने त्यासाठी काही करत आहेत. परंतु व्यवहारात मात्र साथ आवरताना दिसत नाही. पहिल्या लाटेत जनजागृती आणि बाहेरून आलेल्या लोकांचे अलगीकरण यांचा स्तर चांगला होता परंतु दुसऱया लाटेत कोरोना नियम पाळण्याकडे लोकांचे म्हणावे तेवढे लक्ष राहिले नाही.
केंद्र व राज्य सरकारने सर्व जिह्यांना सांगितले आहे की, सापडलेल्या प्रत्येक रुग्णामागे किमान 20 एवढय़ा व्यक्तींची तपासणी व्हायला हवी. एक व्यक्ती बाधित झाल्यावर तिच्यापासून निदान होईपर्यंत 30 जणांना लागण होऊ शकते. म्हणून कमीत कमी 20 एवढय़ा संपर्कातील व्यक्तींची नावे शोधून त्यांच्या चाचण्या करणे अत्यावश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या निर्देशांकडे कोकणातील सर्वच जिह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱयांनी म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्यांचे उद्दिष्ट दूर राहिले आहे. कोकणातील कोरोना नियंत्रणात न येण्यामागे अनेक कारणे असली तरी सर्वात महत्त्वाचे कारण चाचणीसंख्येचे उद्दिष्ट न गाठले जाणे हे एक आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील जिल्हा प्रशासनाला आग्रहपूर्वक चाचणी वाढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे तेथे 1 जूनपासून दरदिवशी 5000 एवढय़ा चाचण्या होत आहेत. रत्नागिरी जिह्यातदेखील दररोज किमान 7000 चाचण्या झाल्या पाहिजेत असे उद्दिष्ट मंत्री उदय सामंत यांनी दिलेले आहे. परंतु जून महिन्यात एकदाही ते उद्दिष्ट गाठण्यास प्रशासकीय यंत्रणेला यश आले नाही.
प्रयोगशाळेत नियमितपणे काम करण्याचा अनुभव असणारे अनेक विज्ञान शिक्षक, प्राध्यापक, संशोधक यांना कोव्हिडच्या ऍन्टीजेन चाचणीसाठी अल्पकाळात प्रशिक्षित करणे शक्य आहे. सध्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, पोलीस मित्रांपासून ते रुग्णालयात सहाय्यकाची भूमिका पार पाडत आहेत. या लोकांना चाचणीचे काम दिल्यास मनुष्यबळ उपलब्धतेचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. याशिवाय आणखी पर्यायदेखील जिल्हा प्रशासनाला विचारात घेता येतील. कोणत्याही परिस्थितीत केंद्र व राज्याने दिलेले चाचणी उद्दिष्ट पार पाडणार असा निर्धार प्रशासकीय अधिकाऱयांनी करायला हवा.
चाचणी उद्दिष्टात यशस्वी होऊन अधिकाधिक रुग्ण विलगीकरणात जातील अशी काळजी घेतली तर कोरोनाचा प्रसार निश्चितपणे टळेल. अनेक लोक गृहविलगीकरणात असताना बंधने झुगारून फिरत असतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गाव पातळीवरील समित्यांना प्रोत्सा†िहत करणे आवश्यक आहे. गृहविलगीकरणामध्ये निर्बंध बाजूला ठेवल्यामुळे कोरोना प्रसार वाढत असल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आले आहे. म्हणून तर गृह विलगीकरणांना थांबवून कोव्हिड काळजी केंद्रामध्ये परिसरातील सर्व रुग्णांना एकत्रित ठेवण्याची योजना करण्यात आली आहे. त्याचे पालन कोकणातील सर्व जिह्यात अधिकाधिक चांगल्याप्रकारे कसे होईल याकडे प्रशासकीय अधिकाऱयांनी लक्ष दिले पाहिजे. रत्नागिरी जिह्यात काही ठिकाणी संशयित लोकांनी चाचणी करून घेण्यास नकार दिला. चाचणी केल्यास बाधित असाच अहवाल येतो असा समज अनेकांमध्ये आहे. लोकांच्या असहकार्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली. अखेरीस पोलिसांच्या मदतीने चाचणी कार्यक्रम घ्यावा लागला. जेथे लोक सहकार्य करणार नाहीत तेथे प्रसंगी गुन्हा दाखल करू इतकी कठोर भूमिका रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी घेतली. कोरोना काळात असलेले विशेष अधिकार योग्य बाबींसाठी वापरण्याची उदाहरणे या निमित्ताने पुढे आली. कोरोनाच्या लढाईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱया बातम्या मन सुन्न करणाऱया असल्या तरी सिंधुदुर्गात तेथील आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या पुढाकाराने एक चांगली बाब पुढे आली आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ होणाऱया रुग्णांना प्राणवायू द्यावा लागतो. साथ रोग वाढत असताना रुग्ण संख्या कल्पनेबाहेर नोंदवली गेली. या रुग्णांपैकी अनेकजण अत्यवस्थ परिस्थितीत असल्याने प्राणवायूची मागणी वाढली. अन्य जिह्यातून तो आणावा लागला. प्राणवायू मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असे. प्रत्येक जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण व्हावा अशी अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्हा या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे नुकतेच जाहीर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लान्ट उभारले गेले. यामधून 225 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. कुडाळ येथे एमआयडीसी क्षेत्रात केवळ 15 दिवसात प्रकल्प उभारला गेला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला. रत्नागिरी जिह्यातदेखील ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी लागत आहे. रत्नागिरी व लोटे पर्शुराम येथील औद्योगिक क्षेत्रातून वायू मागवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालय व अन्य शासकीय रुग्णालयाच्या परिसरात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला जावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. अद्याप शासकीय व्यवस्थेतून रत्नागिरी जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण झाला नसला तरी लवकरच तो होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. तथापि लाट आल्यास त्यावेळी प्राणवायुची कमतरता भासू नये म्हणून रचना करण्यात येत आहे.
सुकांत चक्रदेव