दिड महिन्याच्या कालावधीत 35 हून अधिक कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार : गावासाठी खऱया अर्थाने कोविडयोद्धा म्हणून सेवा गावात आजवर 500 हून अधिक रूग्णांवर अंत्यसंस्कार
गिरीश मांद्रेकर / म्हापसा
देवाने माणसाला सर्व काही दिले आहे मात्र दोन गोष्टीच फक्त आपल्याकडे ठेवल्या आहेत त्या म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन गोष्टी कधी आणि कुठे येतील हे कोणलाच माहित नाही. कारण दैव कुणीच जाणिले नाही. जन्माला आल्यावर मरेपर्यंत माणूस खूप स्वार्थी बनतो. आपले हे आपले ते सर्वकाही आपण आणि आपले मात्र या मोहापायी अखेर त्याला काहीही न घेता रिकामेच जावे लागते. त्याला तिरडीवर घातल्यावर फक्त चार माणसांची गरज असते व त्याच्याबरोबर अंत्ययात्रेला जाणारे काही माणसे. मात्र राज्यात ज्या भयंकर वेगाने मृत्यू होत चालले आहेत ते पाहता आपण एकटा आलो आणि एकटाच जातो हे बोल प्रत्यक्षात खरे होत असल्याचे आम्हाला पहायला मिळत आहेत. आज तिरडीला चार माणसांचा खांदा सोडाच एकही खांदा द्यायाला पुढे येत नाही. मग तो श्रीमंत वा गरीबाचा मृतदेह असो. नियतीने आज घालाच तसा घातलेला आहे. शेजारीपाजारी, नातेवाईक सोडाच घरातील स्वतःची माणसेही अंत्यसंस्काराला येत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत सुकूर गावात देवदूत बनून आलेला कार्तिक साजो कुडणेकर या गावासाठी चर्चेचा विषय बनला आहे. प्रसिद्धीपासून दहा पावले लांबच राहून त्यांनी गावासाठी खऱया अर्थाने कोविडयोद्धा म्हणून सेवा बजावली आहे. गेल्या दीड महिन्याभराच्या कालावधीत श्री. कुडणेकर यांनी 35 हून अधिक मृतदेह स्वतःहून सरणावर नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे मोलाचे काम केले आणि करीत आहेत.
या प्रतिनिधीला ही माहिती कळताच श्री. कुडणेकर यांची भेट घेतली असता याबाबत आपणास प्रसिद्धी नको. जनसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आपण मानतो. आपण प्रसिद्धीपासून चार हात लांब आहे तेच बरे. आपण हे प्रसिद्धीसाठी करीत नाही तर आपल्या गावातील कुणीही कोविडमुळे मरण पावला तर त्याच्यासमोर कुणीही जात नाही. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबातील माणसे तसेच त्याचे नातेवाईक पाठ फिरवितात. त्याला योग्य न्याय देऊन अशा मृत व्यक्तींना सरणावर नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम आपण करतो. कोरोना म्हटले की सर्वजण घाबरतात. त्याच्याजवळ जाण्यास कोणीही धजावत नाही. परंतु माणूस मेल्यावर तो सर्व रोग आपल्या बरोबर घेऊन जातो असे समजून आपण त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावतो. शेवटी आम्ही काय घेऊन जाणार आहोत. विनाकारण मोह, माया धरू नये. सध्या या कोरोनाच्या महामारीत आज असलेला माणूस उद्या दिसत नाही अशी गंभीर परिस्थिती सध्या झालेली आहे.
गाडेकारांचा मुलगा म्हणून परिचित
कार्तिक कुडणेकर हे जिल्हा पंचायत अध्यक्ष असून अलिकडेच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत ते सुकूरमधून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आले असून सर्वांनी एकमताने त्यांची जिल्हा पंचायत अध्यक्षपदी निवड केली आहे. कार्तिक कुडणेकर यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे बैलगाडी चालविण्याचा. त्यांचे आजोबा, त्यानंतर वडिलांनी हा पारंपरिक व्यवसाय गावात कायमस्वरूपी सुरू ठेवलेला आहे. गावात त्यांना ‘गाडेकार’ म्हणून ओळखतात आणि आज सर्वांच्या आशीर्वादाने आपण एक गाडेकाराचा मुलगा जिल्हा पंचायत सदस्य बनून अध्यक्ष झालो असे कार्तिक गर्वाने सागंत आहेत. आपल्या पारंपरिक व्यवसायाला काही लागत नाही. उलट या व्यवसायामुळेच आपली गावात व इतरत्र खऱया अर्थाने ओळख झाली आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो व अध्यक्ष झालो मात्र तो आनंदाचा क्षण पाहण्यास आपले वडील आज हयात नाहीत हे सांगताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही. आपल्या मुलाने मोठे व्हावे. परंतु त्याने बैलगाडीचा व्यवसाय करू नये असे आपल्या वडिलांना वाटत होते. त्यांच्या आशीर्वादाने आपली बहीण स्मिता कुडणेकर आज सीए झाली व आपण जिल्हा पंचायत अध्यक्ष पदापर्यंत पोहोचले असे श्री. कुडणेकर म्हणाले.
वयाच्या 17 व्या वर्षापासून येथे वळलो
आपण जिल्हा पंचायत अध्यक्ष असूनही अंत्यसंस्कारासारखे काम कसे काय करता? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, पूर्वी आपले वडील स्व. साजो कुडणेकर गावात लाकडे कापून नेत होते. मी त्यातील छोटी-मोठी लाकडे राहत असत ती गावातील स्मशानभूमीत नेऊन ठेवत असे. गावात कुणाचाही मृत्यू झाल्यास त्याची सर्वप्रथम माहिती आम्हाला देण्यात येत असे. त्यानुसार आपले वडील स्मशानभूमीत लाकडे नेत होते. त्यावेळी आमच्याकडे बेळगावी, कर्नाटक येथील माणसे कामाला होती. एक दिवस दोन बैलगाडी घेऊन ती लाकडे भरून स्मशानभूमीत गेले असता आपणही हळूचन बैलगाडीवर बसून त्यांच्याबरोबर गेलो. तेव्हा एक मृतदेह स्मशानात आला होता. त्यावेळी आपले वय 17 वर्षे होते. आपण ते सर्व पाहिले व ती लाकडे स्मशानभूमीत सरणावर रचताना पाहिली व मीही ती लाकडे रचण्यास मदत केली. एवढेच नव्हे तर मृतदेह उचलून वर सरणावर ठेवण्यास हातभार लावला. तेथूनच आपण हे काम करण्यास धजावलो. विशेष म्हणजे स्मशानभूमीबद्दलची एक भीती मनात असते ती नाहीशी झाली व तेव्हापासून म्हणजे वयाच्या 17 व्या वर्षापासून आजपर्यंत गावात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला घरातून बाहेर काढण्यापासुन सरणावर ठेवून अंत्यसंस्कार झाल्यावर मृतदेह संपूर्ण जळेपर्यंत आपण राहतो असे श्री. कुडणेकर म्हणाले. आपण प्रसिद्धीसाठी हे सर्व करत नाही. आणि आपणास प्रसिद्धीही नको. वयाच्या 17 व्या वर्षापासून आजपर्यंत आपण 500 हून अधिक मृतदेह सरणावर रचून त्यांचे अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या दिड महिन्याच्या कालावधीत गावातील व इतर मिळून 35 हून अधिक कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे कार्तिक कुडणेकर म्हणाले. कोविड मृतदेहाला कोणी हातही लावत नाहीत. स्वतःचे कुटुंब तसेच नातेवाईकही पाठ फिरवतात, हा कटू अनुभव आपणास या महामारीत अनुभवायला मिळायला. औषधांचा डोस जास्त झाल्याने काहीजणांचा हृदयाकडील भाग तर काहींचा खासकरून महिलावर्गाचा पोटाजवळील भाग जळत नाही असा भाग नंतर कुऱहाडीने फोडून पुन्हा आगीत टाकून पेटवावा लागतो. तेही काम आपल्यालाच करावे लागते. यासाठी आपण स्मशानभूमीत एक कुऱहाड आणून ठेवल्याचेही ते म्हणाले.
अंत्यसंस्कार विधीचे सामानही कमी पडू देत नाही
गावात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याची सर्वप्रथम माहिती आपणास दिली जाते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱया सामानासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एक आहे तर दुसरे नाही असाही प्रकार होतो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लागणारे सवं सामान आपण आणून ठेवले आहे. कुणाही गोरगरिबाला अंत्यसंस्कारासाठी सामान मिळत नसल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. आपण हे पैशांसाठी करत नसून जनसेवेच्या उद्देशाने करीत आहे. मरणाचे पैसे कुणीही ठेवत नाही. जो कुणी स्वखुशीने जे देतो ते घेतो व त्यातच समाधान मानतो. पूर्वी आमच्या गावात जळणासाठी टायर वापरत असत. आम्ही सर्वांनी बैठक घेऊन टायर घालणे बंद केले. मंत्राग्नी आता आम्ही तुपाने देतो व मृतदेह तुपानेच पेटवितो अशी माहितीही श्री. कार्तिक कुडणेकर यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.