आपकडून संताप व्यक्त; कामगारांच्या आंदोलनात सहभाग
प्रतिनिधी /पणजी
दुसऱया कोविड लाटेदरम्यान गोमेकॉत नियुक्त केलेल्या 400 मल्टी-टास्किंग कर्मचाऱयांना अद्याप पगार मिळालेला नाही. इस्पितळ प्रशासनाने पाच महिन्यांची एकत्रित वेतन बिले लेखा संचालनालयाकडे पाठविली आहेत. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याने ती अडून पडली आहेत आणि या प्रक्रियेत कोविड योद्धे भरडले गेले आहेत. या एकूण प्रकाराबद्दल आम आदमी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कामगारांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असून प्रसंगी न्यायालयातसुद्धा दाद मागणार असल्याची ग्वाही दिली आहे.
आपचे नेते ऍड. अमित पालयेकर, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि सुरेल तिळवे यांना माहिती मिळताच त्यांनी गोमेकॉत भेट देऊन सदर कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. एकीकडे संपूर्ण देश या कोविड योद्धांच्या सेवेचे कौतुक करत आहे तर दुसरीकडे गोव्यात मात्र त्यांना सहा महिन्यांपासून वेतन सुद्धा दिले जात नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. या कामगारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्णांची सेवा केली. अशा कामगारांना सहा महिन्यांनंतरही वेतनासाठी संघर्ष करावा लागतो हे अतिशय दुःखद आहे, असे पालयेकर म्हणाले.
एकीकडे सावंत सरकार 10 हजार नोकऱया देण्याचे डांगोरे पिटतात तर दुसरीकडे विद्यमान कामगारांना पगारही देऊ शकत नाहीत, हा दैवदुर्विलास आहे. त्यासाठी सरकारने एकत्र येऊन कृती केली पाहिजे, अन्यथा गोवेकर या सरकारला धडा शिकवतील अस पालेयकर पुढे म्हणाले.
प्रमोद सावंत यांचा अजून एक खोटारडेपणा समोर आला असून सावंत यांनी या कोरोना योद्ध्यांच्या स्थितीबद्दल पंतप्रधान मोदींची दिशाभूल केली आहे, असे वाल्मिकी नाईक म्हणाले. प्रंटलाइन कोविड कामगारांना त्यांच्या पगारासाठी आंदोलन करावे लागते हे लज्जास्पद आहे, असे ते पुढे म्हणाले.
आपची म्हापसा साबांखा कार्यालयावर धडक
दरम्यान, सामान्य जनतेच्या समस्येवर आवाज उठवत आम आदमी पक्षाने सोमवारी राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा येथे साबांखा अभियंत्यांना घेराव घातला.
म्हापसा येथील लोकांना अनेक महिन्यांपासून मासिक पाण्याची बिले मिळत नाही आणि समस्येत भर म्हणून त्यांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. काहींना तर ही बिले भरण्यास असमर्थता दर्शविल्याबद्दल त्यांना कनेक्शन तोडण्याच्या नोटिसाही मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी इथल्या स्थानिकांसोबत संबंधित खात्याच्या कार्यालयावर धडक देवून अधिकाऱयांना धारेवर धरले.
सावंत यांनी प्रथम प्रत्येक घराला पाणी देण्याचे आणि नंतर प्रत्येक घराला 16,000 लिटर मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्यातील काहीच घडले नाही. उलटपक्षी नागरिकांना भरमसाठ रक्कमेची बिले मिळत आहेत आणि अधिकारी त्यात दुरुस्ती करण्यासही टाळाटाळ करत आहेत, असा आरोप म्हांबरे यांनी केला.