विजय सरदेसाई यांची मागणी
प्रतिनिधी/ मडगाव
कोविड लसीकरण करताना स्थानिकांना प्राधान्य मिळण्याची गरज फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली असून सध्या गोव्यात कुठल्याही राज्यातील व्यक्ती येऊन लस टोचून जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शनिवारी मडगाव आरोग्य केंद्रात लस टोचून घेण्यासाठी वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील फार्मा कारखान्यांत काम करणाऱया कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे स्थानिकांना रांगेत ताटकळत राहावे लागत होते. याची दखल घेऊन सरदेसाई स्थानिक नगरसेवकांना घेऊन आरोग्य केंद्रावर दाखल झाले. स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना या केंद्रात प्राधान्य कसे दिले जाते, असा सवाल त्यांनी केंद्राच्या डॉक्टरना केला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरदेसाई म्हणाले की, फार्मा उद्योगातील कामगारांना कोविड आघाडीवरील कर्मचारी म्हणून घोषित केले गेले असेल, तर आमची काहीच हरकत नाही. मात्र या कामगारांसाठी वेर्णा येथे केंद्र उभारावे. मडगावच्या या केंद्रावर केवळ स्थानिकांनाच लस द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईत एका भागात राहणाऱया नागरिकाला दुसऱया भागात जाऊन लस घेता येत नाही आणि येथे गोव्यात कुणालाही दारे उघडी केली गेली आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोवेकरांची काळजी नसून त्यांना फार्मा उद्योगातील 5 हजार कामगारांचेच अधिक पडून गेले आहे असे वाटते, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री सावंत यांच्या कोविड व्यवस्थापनातील चुका दाखवून देत असल्यामुळे ते मला बेकार म्हणतात. त्यांनी मला बेकार म्हटले तरी हरकत नाही. पण स्थानिकांवर अन्याय झाल्यास मी रस्त्यावर उतरेनच, असे त्यांनी सांगितले. मला बेकार म्हणणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी ज्या सूचना दिल्या होत्या त्या उशिरा का होईना स्वीकारू लागले आहेत. कोविड व्यवस्थापनासाठी कृती दल नेमावे ही मागणी मी कित्येक दिवसांपूर्वी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आता ते स्थापन केले आहे. लसींसाठी जागतिक निविदा मागविण्याची सूचनाही मी यापूर्वी केली होती. तिही आता मुख्यमंत्री पूर्ण करणार आहेत. मात्र गोवेकरांच्या पैशांतून विकत घेतलेल्या या लसींचा फायदा गोवेकरांनाच मिळण्याची गरज आहे, असे सरदेसाई म्हणाले.