ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कारोना संदर्भात एक लाख पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर पोलिसांवर हल्ले होणाऱ्या 200 घटना घडल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रात 22 मार्च ते 9 मे दरम्यान कलम 188 नुसार 1 लाख 1 हजार 316 गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 19 हजार 513 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 732 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लॉक डाऊन मध्ये महाराष्ट्र सायबर विभागाने 336 गुन्हे दाखल केले असून यामध्ये 198 जणांना ताब्यात घेतले आहे.
पुढे ते म्हणाले, पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असून या नंबर वर 84 हजार पेक्षा अधिक फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे.
त्याच बरोबर विवध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 82 लाख 27 हजार 794 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर महाराष्ट्र राज्यातील 2 लाख 55 हजार 266 व्यक्तीना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आत्तापर्यंत पोलिसांकडून तीन लाखापेक्षा अधिकांना पासेस दिले गेले आहेत.
त्याचबरोबर अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 291 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 55 हजार 650 वाहने जप्त केली गेली आहेत. तर विदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.