कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल – महाराष्ट्र काँग्रेस
ऑनलाईन टीम / तरुण भारत
केंद्रीय यंत्रणा जाणिवपुर्वक आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप राज्यातील अऩेक मंत्री करत आहेत. गेले कित्येक दिवस सुरु आहे. या आरोप – प्रत्यारोपांची मालिका अजुन ही थांबलेली नाही. यातच गुरुवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. यात राज्यापालांनी काही दिवसांपुर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह भाष्य यावरुन विधीमंडळात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसने काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ट्विट करत निषेध केला. “काय ते हातवारे, काय ते हसणं… सारंच किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” तसेच क्रांतिज्योतीबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृतीच दिसते असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलंय.
या ट्विटसोबत राज्यपालांच्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. सावित्रिबाई पुतळा अनावरण सोहळ्यामधील राज्यपालांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये राज्यपाल हे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय. त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं. याच वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केलाय.