बालासोर / वृत्तसंस्था
ओडिशाच्या बालासोर केंद्रावरुन भारताने अत्याधुनिक क्षेपणास्त्र वायुसुरक्षा प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. रविवारी सकाळी हे परीक्षण करण्यात आले. भूमीवरुन आकाशात मारा करणारी ही प्रणाली आहे. या परीक्षणामुळे भारताचे शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून अधिक प्रभावीपणे संरक्षण होणार आहे.
ही माहिती भारतीय संरक्षण आणि संशोधन संस्थेकडून (डीआरडीओ) देण्यात आली. 23 मार्चला भारताने भूमीवरुन भूमीवर मारा करणाऱया ब्राम्होस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. या दोन्ही क्षेपणास्त्र प्रणालींमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत आणि मारक क्षमतेत मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे.
नष्ट करण्याची क्षमता
या क्षेपणास्त्र प्रणालीत शत्रूने सोडलेल्या क्षेपणास्त्रांचा आकाशातच नाश करण्याची क्षमता आहे. तसेच शत्रूच्या युद्ध विमानांनाही लक्ष्य करण्याची क्षमता आहे. ही प्रणाली मध्यम पल्ल्याची असून तिचा समावेश यापूर्वीच भारताच्या सेनेत करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्रांचे उत्पादनही हाती घेण्यात असून या प्रणालीत अधिकाधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
स्वयंपूर्णतेचा प्रयत्न
संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत भारत गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने आणि गंभीरपणे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून भारताने स्वदेशनिर्मित बहुविध क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. भूमीवरुन भूमीवर, भूमीवरुन आकाशात आणि आकाशातून भूमीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली जात आहेत.
निर्यातीत 6 पट वाढ
भारताने स्वदेशनिर्मित शस्त्रसामुग्री निर्माण करण्याचे प्रयत्न गतिमान केले असून या शस्त्रांची निर्यातही भारत करत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये भारताच्या शस्त्रनिर्यातीत सहापट वाढ झाली असून आता ती 11,607 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली.