एक लाखाचे नुकसान, शेतकरी चिंतेत, कारवाईची मागणी
वार्ताहर / खंडेराजूरी
खंडेराजुरी ता. मिरज येथील प्रविण सुरेश माणगावकर या शेतकऱ्याच्या द्राक्षबागेतील द्राक्ष झाडांची अज्ञातांनी कत्तल केली आहे. अज्ञाताने सुमारे शंभर झाडे मुळासकट कापली असून, 50 ते 60 झाडांची अर्धवट मोडतोड करुन द्राक्षबागेची नासधूस केली आहे. या प्रकारामुळे द्राक्षबागायत शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.शेतकरी माणगांवकर यांनी ग्रामीण पोलिसांत धाव घेत द्राक्षबागांची विनाकारण कत्तल करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
प्रविण माणगांवकर हे द्राक्षबागायतदार शेतकरी असून, खंडेराजूरी-माळवाडी रस्त्यालगत गट नंबर 145 मध्ये त्यांनी द्राक्षबाग लावली आहे. शुक्रवारी नियमितपणे प्रवीण माणगावकर सकाळी साडेसहाच्या सुमारास द्राक्षबागेत गेले असता द्राक्षबाग कापण्यात आल्याचा प्रकार लक्षात आला. यावेळी द्राक्ष बागेतील ठिबक सिंचनाचे पाईप ही मध्यातून कापली असून, पाण्याचा चेंबरही फोडला असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ मिरज ग्रामिण पोलिसात धाव घेत याबाबत फिर्याद दिली आहे.