प्रतिनिधी / सातारा
मंगळवारी रात्री 8 वाजणेच्या सुमारास खंबाटकी घाट उतरत असताना भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळे गावानजीक पहिल्याच वळणावर कार क्र. एम एच 06 ए डब्ल्यु 6755 ने अचानक पेट घेतला. यामध्ये कार पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने कार मधील दोन्ही प्रवासी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून वाईला जाणारी कार घाट रस्त्यात उतारावरील एका वळणावर आली असता कारने अचानक पेट घेतला. इंजिन गरम होवून शॉर्ट सर्किटमुळे कारने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालकाने ती कार रस्त्याच्या एका बाजूस उभी करून कारमधील दोन्ही व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या व्यक्ती मुंबईहून वाईला जात होत्या. पेटलेल्या कारमुळे रस्त्याकडेचे झाड देखील पेटले व ही आग संपूर्ण परिसरात फोफावली. याची माहिती वेळे गावातील लोकांना समजताच तातडीने घटनास्थळी जाऊन त्यांनी पोलिसांना पाचारण केले. तोपर्यंत घाटातील संपूर्ण वाहतूक बंद ठेवली.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग विझविली. तसेच वाई नगर पालिकेचा अग्निशामक बांबदेखिल घटनास्थळी दाखल झाला. या आगीत गाडी संपूर्णतः जळून खाक झाली. गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत.