पथदीप सुरू असल्याने नाराजी : मनपाच्या कारभाराबद्दल संताप
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या राज्यात वीजटंचाईचे संकट कोसळले आहे. दगडी कोळशाचा साठा नसल्याने काही दिवसातच भारनियमनाचे संकट ओढवणार असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे वीज बचत करणे गरजेचे आहे. पण गुरुवारी दिवसाही पथदीप सुरू ठेवून उजेड पाडण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गोंधळी गल्ली व रिसालदार गल्ली परिसरात दिवसाही गुरुवारी पथदीप सुरू ठेवण्यात आले आहेत. याबाबत संबंधितांना वारंवार सांगण्यात आले. मात्र दोन ते तीन तास हे पथदीप सुरूच होते. सध्या शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होताना दिसत आहे. रिसालदार गल्ली, खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वीजतारांवर दोन दिवसांपूर्वी झाडाची फांदी कोसळून वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवानेच या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र त्यानंतर या परिसरात दिवसाही पथदीप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले आहे. झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारा आणि घरांवर पडण्याचे प्रकार घडत आहे. हे सारे दुरुस्त करण्यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना धडपड करावी लागत आहे. भारनियमनचे संकट समोर दिसत असताना वीज बचत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून मनपाकडून याकडे अधिक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे दिवसा पथदीप सुरू ठेवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. जनतेला मात्र वारंवार वीज बचत करा, असे आवाहन केले जाते. मात्र प्रत्यक्षात महापालिका किंवा इतर सरकारी कार्यालये त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.