भाजपच्या दणक्यानंतर आठ दिवसांत खड्डे बुजविण्याची ग्वाही : आंदोलनाने बांदा-दोडामार्ग वाहतूक ठप्प
प्रतिनिधी / बांदा:
बांदा-दोडामार्ग रस्त्याची झालेली अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. गेली चार वर्षे अशीच रस्त्याची परिस्थिती असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. अखेर प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपच्यावतीने बांदा येथे ‘जनता गेली खड्डय़ात’ आंदोलन सोमवारी करण्यात आले. सकाळी साडेदहाला सुरू झालेले आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. यात भजन आंदोलन सुद्धा करण्यात आले. बांदा-दोडामार्ग मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली. आम्हाला ठोस लेखी आश्वासन हवे अन्यथा आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला.
यावेळी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
यावेळी बांधकामाचे अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा-दोडामार्ग राज्यमार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या डिसेंबर महिन्यात या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुरू करण्यात येईल. तोपर्यंत पावसाळी डांबराने या रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात बुजवण्यात येतील, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम अभियंता चव्हाण यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
..तर पुन्हा आंदोलन!
सध्या जांभ्या दगडाने खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम तात्काळ बंद करा, अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केली. जर येत्या आठ दिवसात खड्डे बुजविण्याचे काम सुरू न केल्यास कोणत्याही दिवशी आंदोलन करू. त्याचे स्वरुप वेगळे असेल, असा इशारा तेली यांनी दिला.
तोपर्यंत पावसाळी डांबराने खड्डे भरणार!
बांदा-दोडामार्ग या राज्य मार्गावर खड्डे पडले आहेत. संबंधित विभाग व सत्ताधारी केवळ आश्वासने देत असल्याने भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता चव्हाण यांनी या मार्गावरील खड्डे जांभ्या दगडाने भरत रस्ता चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजप पदाधिकाऱयांनी आमचा तुमच्यावर विश्वास नाही. मार्चमध्ये पण तुम्ही आश्वासन दिले होते. ते कुठे गेले? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी केला. तुम्हाला व तुमच्या वरिष्ठांना आम्ही एक दिवस सायकलवरून फिरवणार, तेव्हाच तुम्हाला सर्वसामान्यांना होणारा त्रास दिसून येईल. तसेच जांभ्या दगडाने खड्डे भरण्यास तीव्र विरोध करीत पावसाळी डांबराने खड्डे भरा व तसे लेखी आश्वासन वरिष्ठांकडून घेऊन या, असे ठणकावले. अधीक्षक अभियंता यांनी तेली यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत चर्चा केली. डिसेंबर महिन्यात काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत पावसाळी डांबराने खड्डे भरण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. बांदा सदस्या श्वेता कोरगावर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, महिला बालविकास सभापती शर्वाणी गावकर, सावंतवाडी पं. स. उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सभापती मानसी धुरी, भाजपयुमो उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा शहर अध्यक्ष राजा सावंत, बाळू सावंत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी, श्याम सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, मंगल मयेकर, महिला तालुकाध्यक्ष प्रियांका नाईक, अवंती पंडित, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, महेश धुरी, गुरू सावंत, मधुकर देसाई, प्रवीण पंडित, प्रवीण देसाई, संजय विरनोडकर, नगरसेवक आनंद नेवगी, नेमळे सरपंच विनोद राऊळ, नीलेश कदम, दादू कविटकर, सुधीर दळवी, सूर्यकांत गवस, शंकर देसाई, नीलेश सावंत यांच्यासह दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.