मिलिंद नाईक यांच्यासह एमपीटी, खाण विभाग व इतरांविरूध्द
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव बंदरातील खनिज चोरी प्रकरणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्यासह एमपीटी, कोडी रिसोर्सीस, खाण व भू गर्भ शास्त्र विभाग यांच्या विरूध्द मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असून आपण मंत्र्याविरूध्द खनिज चोरी प्रकरणी केलेले आरोप खोटे असल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून सन्यास घेण्याची आपली तयारी असल्याचे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंत्री व संबंधीतांविरूध्द त्वरीत कारवाई करावी अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.
संकल्प आमोणकर यांनी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांसह मुरगाव पोलीस स्थानकात दाखल होऊन खनिज चोरी प्रकरणी मंत्री मिलिंद नाईक व इतरांविरूध्द पोलीस तक्रार केली. मुरगाव बंदरात गैरमार्गाचा अवलंब करून मिलिंद नाईक यांच्या मुरगाव बंदरात कार्यरत असलेलया स्टिवडोरींग आस्थापनाने 1800 मॅट्रिक टन लोह खनिज बार्जीसमध्ये लोड करून नंतर निर्यातीसाठी जहाजामध्ये लोड केले. या प्रकरणी त्वरीत एफआयआर नोंद करून लोह खनिजाने भरलेले जहाज बंदरातून सुटण्यापूर्वीच सखोल चौकशीला प्रारंभ व्हायला हवा अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे. या चोरीसाठी जी यंत्र सामुग्री वापरण्यात आली ती जप्त करण्यात यावी. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी आपण न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करणार आहे. आपण जर राजकीय फायदय़ासाठी मंत्री नाईक यांच्याविरोधात खोटे आरोप करीत असल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून संन्यास घ्यायचीही आपली तयारी आहे असे आमोणकर यांनी म्हटले आहे.
मुरगाव भाजपा मंडळाने संकल्प आमोणकर यांनी मंत्री नाईक यांच्या विरोधात खनिज चोरीचे आरोप केल्याने कायदेशीर कारवाईची ताकीद दिली होती. त्याविषयी बोलताना शंभर कायदेशीर कारवायांना सामोरे जाण्याची आपली तयारी असून जनतेचे विषय उचलून धरण्याचे आपण कदापी बंद करणार नाही. आम्ही खनिज चोरी प्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे. आवश्यक फोटो आणि कागदपत्रेही पोलिसांना सादर करण्यात आलेली आहेत. आता या प्रकरणाच्या पुढील चौकशीची जबाबदारी शासकीय अधिकाऱयांची आहे. त्यांनी आता जनतेला न्याय द्यावा. चोरी करण्यात आलेला मुरगाव बंदरातील खनिज माल सांडलेला आणि त्या ठिकाणी राहिलेला माल होता. त्याला स्पिलेज या नावाने ओळखण्यात येते. योग्य प्रक्रियेनंतरच हा माल ज्यादा बोली देणाऱयाला लिलावात विकणे आवश्यक होते. मात्र, तसे काही न करता गैरमार्गाने हा व्यवहार उरकण्यात आला असे आमोणकर यांनी म्हटले आहे.