पूरपट्टय़ातील अनेकांनी आत्तापासूनच सुरू केले राहण्यासाठी बुकींग : पुराची धास्ती वाढली
प्रतिनिधी / सांगली
यंदाच्यादेखील पुन्हा महापूर येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे सांगली शहरासह पूरपट्टय़ातील अनेकांनी आत्तापासूनच स्थलांतराची तयारी सुरू केला आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरात ज्या भागात पाणी आले नव्हते त्या ठिकाणी राहण्यासाठी घरे, हॉल, मंगल कार्यालयांचे बुकींग सुरू केले आहे. विशेष म्हणजे यासाठी आगाऊ दोन-तीन महिन्याचे भाडेही दिले जात आहे.
कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात मागील वर्षी तुफान पाऊस झाला. पावसाने गेल्या अनेक वर्षाचे रेकॉर्ड तोडले. चोवीस तासात दोनशे मिली मिटरहून अधिक पावसाची नोंद झाली. पावसाच्या पाण्याने कृष्णा, वारणा नद्यांना महापूर आला आणि सांगली शहरासह, इस्लामपूर, मिरज, पलूस, शिराळा या चार तालुक्यातील 104 गावांना मोठा फटका बसला. हजारो हेक्टर ऊसक्षेत्रासह इतर पिके पाण्यात गेली. मोठय़ा प्रमाणात घरे पडली. जनावरे पाण्यात वाहून गेली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मोठय़ा शहरात पाणी घुसल्याने येथीलही कोटय़वधीचे नुकसान झाले.
पंधरा ते वीस दिवस जनजीवन विस्कळीत झाले. पाण्याने सर्वत्र हाहाकार माजविला. लाखोंचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मिलिटरी बोलवावी लागली. हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. एकूणच महापुराने होत्याचे नव्हते केले. जिल्हय़ाचे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाले. या पुराच्या धसक्यातून आणि नुकसानीतून पूरग्रस्त बाहेर आले नाहीत, तोपर्यंतच या वर्षीही महापूर येणार असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने शहरासह नदीकाठच्या गावातील लोकांनी पुन्हा चांगलाच धसका घेतला आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये महापूर आला होता. या वर्षीही याच महिन्यात पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच कोयनेत सध्या मागील वर्षाच्या तुलनेत जादा पाणीसाठा आहे. शिवाय पाऊसही जादा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळेच लोकांनी या वर्षीही महापूर येणार याची धास्ती घेतली आहे. महापूर आल्यास ऐनवेळी पळापळ नको म्हणून सांगली शहरासह पूर पट्टय़ातील अनेकांनी आत्तापासूनच राहण्यासाठी जागांचा शोध सुरू केला आहे.
काहींनी तर पूरपट्टय़ाच्या बाहेर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येणार नाही अशा म्ह्णजे कारखना परिसर, कुपवाड, विश्रामबाग, मिरज, माधवनगर, बुधगाव, आदी ठिकाणी आगाऊ भाडे देवून घरांचे, हॉल आणि मंगलकार्यालयाचे बुकींग सुरू केले आहे. गावभागातील एका गुपने तर विश्रामबाग येथील मोठाच्या मोठा हॉल बुकींग केला आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात सुरू असून रूग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थितीत येथील पै-पाहुण्यांकडे जाणे शक्य नाही त्यामुळे जवळच सुरक्षित ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. पूरपट्टय़ात लोकांना नोटिसा यंदाही पूर येण्याचा धोका अधिक असल्याने मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. कृष्णा नदी पातळी 25 फुटपर्यंत आल्यानतंर तातडीने घरे सोडावीत, काही दुर्घटना घडल्यास प्रशासन कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी शहरास नदीकाठच्या गावांना लोकांना नोटीस देण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत 50 हजारावर कुटुंबांना नोटिसा दिल्याचे सांगण्यात आले.