चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
हो अगदी असाच प्रश्न पडावा अशी सातारा जिह्यातील कोरोना प्रादुर्भावाचे स्थिती आहे. मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल झाल्याने जिल्हा भयभीत झाला आणि लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याच्या दुसऱया दिवशी समोर येत असलेली वास्तव स्थिती धक्कादायक आहे. कोणीतरी एक कोरोना पॉझिटिव्ह सापडतो आणि त्याच्या संपर्कातील कोणताही त्रास नसलेली माणसं उचलली जात आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने माणसांना आरोग्य विभाग घेऊन जातो मात्र त्यांना येणारे अनुभव प्रचंड विदारक असल्याचं सत्य समोर येतंय. असाच प्रकार एका युवकाचा सोबत घडला त्याचीही कहाणी. पॉझिटिव्ह असूनही कोणतेही उपचार न घेता बरा झालेला युवक रविवारी घरी पोहोचला पण त्याच्या मनात अनेक प्रश्नांचे जंजाळ तसेच आहे.
शिरवळमधील या युवकाचा मित्र पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या पॉझिटिव्ह मित्रामुळे सर्व घाबरुन गेले होते. त्यातच हा युवक आणखी चार-पाच युवक आहेत. हायरिस्क कॉटॅक्टमुळे या युवकासह त्याच्या इतर चार पाचजणांना ताब्यात घेतले. शिरवळच्या शिंदेवाडी चेकपोस्टला त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांचे निदान पॉझिटिव्ह केले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून वाई येथे नेवून त्यांच्या रक्त तपासणी तसेच एक्सरे काढण्यात आला. त्यांच्या स्वॅबही घेण्यात आला. मग ज्या कहाणी सुरु आहे त्या युवकाला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
हा युवक घाबरुन गेला होता. एकतर कोरोनामुळे श्वास घ्यायला प्रचंड त्रास वगैरे होतो. आता आपले कसे होणार असे त्याला वाटले होते. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता तरी त्याला काहीही त्रास नव्हता व कोणतीही लक्षणेही नव्हती. युवकास त्याच्या इतर चार पाचजणांना सात दिवस मग वाईच्या किसनवीर महाविद्यालय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर मग शिरवळच्या जगताप कोरोना केअर सेंटरमध्ये तीन दिवस ठेवले. रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना देखील त्यांच्यावर ना कोणते उपचार ना काही. उलट त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये गैरसुविधा होत्याच व जेवणाचा दर्जाही चांगला नव्हता.
जर मी व माझे मित्र पॉझिटिव्ह होतो तर उपचार न करता केवळ क्वारंटाईन सेंटरमध्ये कसे काय ठेवले. कारण आमच्यामुळे तेथील इतरांना बाधा होण्याची भीती नव्हती काय? पॉझिटिव्ह होतो तर आमच्यावर औषधोपचार का केला नाही? असा त्या युवकाचा सवाल आहे. त्याचा पॉझिटिव्ह आलेला मित्र व त्याचे वडील या दोघांना निदानानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. मात्र तिथे त्यांना गरम पाणी प्या, दालचिनी, लवंग खा असे करत त्यांच्या उपचाराचा खर्च खासगी हॉस्पिटलने लाख लाख रुपये वसूल केलेला आहे.
हायरिस्क कॉटॅक्ट असून ते निगेटिव्ह
युवक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील त्याच्या दोन जवळच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅबही घेण्यात आला मात्र विशेष म्हणजे युवकाच्या अतिसंपर्कात असून देखील त्याच्या दोन नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे हे सुदैवाचे असले तरी युवकाबरोबर राहून त्या पॉझिटिव्ह आल्या नाहीत मग त्यांना घरी सोडण्यात आले होते. ज्यांनी ‘तरुण भारत’कडे तक्रारी केल्या आहेत त्यांची नावेही आमच्याकडे उपलब्ध आहेत.
रिपोर्ट देण्यास नकार
युवक पॉझिटिव्ह होता त्याच्यावर उपचार करणे गरजेचे होते. मात्र तसे काही न करता पॉझिटिव्ह असलेला हा युवक व त्याच्यासमवेत इतर 25 जण शिरवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये होते. त्यापैकी कोणालाही काहीच त्रास नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे दहा दिवसांनतर पॉझिटिव्ह असलेला युवकाला डिस्चार्च देवून क्वारंटाईन होण्यास सांगितले. सहा दिवस तो युवक मित्रांसह क्वारंइटाईन राहिला होता. रविवारी तो घरी गेला. त्याला ना प्रशासनाने निरोप दिला वा कोणते सर्टिफिकेट. त्याला डिस्चार्जही दिला मात्र पुन्हा स्वॅब न घेता तो निगेटिव्ह कसा आला हा त्याचा प्रश्न असून त्याला आरोग्य विभागाने त्याचे रिपोर्ट देण्यास नकार दिला आहे.
प्रशासनाचे हे नेमके काय चाललेय
एकीकडे जिल्हय़ात मोठय़ा संख्येन कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे अशी स्थिती असताना असंख्य जणांना काहीही त्रास नसताना ताब्यात घेवून त्यांच्या तपासण्या सुरु आहेत आणि त्यांना पॉझिटिव्ह घोषित केले जात आहे. त्यात या समोर आलेल्या प्रकारात यांना काहीही त्रास तर नव्हताच तरीही त्यांना का ठेवून घेण्यात आले आणि पॉझिटिव्ह होते तर त्यांच्यावर काहीच उपचार का केले नाहीत. त्यांना रिपोर्टची मागणी केल्यानंतर त्यांना रिपोर्ट का देण्यात येत नाहीत हे प्रश्न असून त्यांची नावे आवश्यक असल्यास प्रशासनास देण्यात येतील पण कोणतीच लक्षणे नसलेल्यांना प्रशासन बाधित घोषीत करुन संख्या का वाढवत आहे या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.