नागरिकांच्या बेपर्वाईमुळे वाढतोय धोका : अत्यावश्यक सेवा-जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिली असताना नियमांचा फज्जा
प्रतिनिधी / बेळगाव
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही बेळगावचे नागरिक मात्र भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडवित आहेत. विकेंड कर्फ्यु असतानाही सकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली होती. तोंडाला ना मास्क ना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढला आहे. काही नागरिकांच्या बेपर्वाईमुळे इतरांनाही त्याचा फटका बसत आहे.
कोरोनाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने विकेंड कर्फ्यु लागू केला आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शनिवार व रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दूध, भाजीपाला सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे बेळगावमध्ये शनिवारी व रविवारी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागासोबत शहापूर, वडगाव, काकतीवेस, शाहूनगर रोड येथे भाजी व इतर साहित्याची विक्री करण्यात येत होती.
परंतु भाजी खरेदीसाठी रविवारी सकाळी तोबा गर्दी दिसून आली. नरगुंदकर भावे चौक, कांदा मार्केट तसेच शहापूरच्या काही भागात खरेदीसाठी गर्दी दिसून आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मनपाचे कर्मचारी सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत होते. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत मास्कचा वापर न करताच भाजी व साहित्याची खरेदी सुरू होती. सकाळी 9.30 नंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या. काही ठिकाणी विपेत्यांना काठीचा प्रसाद देऊन दुकाने बंद करण्याची वेळ आली.
भाजीपाला मिळणारच नाही का?
रविवारचा विकेंड कर्फ्यू सोमवारी संपल्यानंतर भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंची विक्री पुन्हा सुरळीत होणार आहे. ही माहिती असतानाही उद्यापासून भाजीपालाच मिळणार नाही अशा पद्धतीने रविवारी बाजारात गर्दी करण्यात आली होती. एकीकडे प्रशासन गर्दीवर नियंत्रणासाठी विविध प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र काही जणांचा अति आत्मविश्वास नडत आहे. त्यामुळे यापुढेही अशीच गर्दी कायम राहिल्यास पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येणार असल्याचे सूज्ञ नागरिकांमधून सांगितले जात आहे.
अधिक दराने भाजी विक्री
विकेंड कर्फ्युमुळे एपीएमसी बंद ठेवण्यात आली होती. भाजीची आवक झाली नसल्याने किरकोळ विपेत्यांनी भाजीचे दर वाढवून शनिवारी व रविवारी त्याची विक्री केली. दोन दिवसात दरात मोठी वाढ केल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात होता. लग्नसराई तसेच इतर नियोजित कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी मिळेल त्या दराने भाजी खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली. कोरोनाच्या काळातही पैसे मिळविण्यासाठी असे धंदे करणाऱयांवर नाराजी व्यक्त केली जात होती.