पूर ओसरला आता स्वच्छतेचे आव्हान; समाधीस्थळ सुरक्षित
वार्ताहर/ कराड
मुसळधार पाऊस व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने कृष्णा व कोयना नद्यांनी रौद्र रूप धारण केले होते. गेली तीन दिवसांपासून आलेल्या महापुराने नदी काठच्या गावांत हाहाकार उडाला होता. मात्र शनिवारपासून सलग दुसऱया दिवशी पावसाने उघडीप दिल्याने कोयना धरणातून विसर्ग कमी केला आहे. परिणामी कृष्णा व कोयना नद्यांचे पूर ओसरले असून दोन्ही नद्या मुळ पात्रातून वाहात आहेत. पूर ओसरलेल्या भागात मात्र गाळाचे साम्राज्य पसरले आहे. आता स्वच्छतेचे आव्हान आहे.
सातारा जिह्यासह कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारपासून ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यातच कोयना धरणातील पाणी साठा अत्यंत वेगाने वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी कृष्णा व कोयना नद्यांना महापूर आले. कराड व पाटण तालुक्यातील नदी काठच्या गावांत पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता.
शनिवारपासून पावसाची उघडीप व विसर्ग कमी केल्याने महापूर ओसरण्यास मदत झाली आहे. शनिवारी दुपारपासूनच कराड शहर व परिसरातील गावांतील पूर ओसरण्यास सुरवात झाली होती. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने रविवारी कराड व पाटण तालुक्यातील पूर्ण पूर ओसरला असून कृष्णा व कोयना दोन्ही नद्या पात्रातून वाहात आहेत. पुर ओसरलेल्या भागात मात्र गाळाचे साम्राज्य पसरले आहे. कृष्णा घाट व प्रितीसंगम बाग पाण्याखाली गेली होती. आता पूर ओसरला असल्याने पालिकेला या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी लागणार आहे. पाटण कॉलनी, कोयनेश्वर मंदिर, रंगारवेस या भागातही स्वच्छता मोहीम राबवावी लागणार आहे.
समाधीस्थळाची स्वच्छता
नगरपालिकेने रविवारी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाची स्वच्छता केली. समाधीस्थळ दोन दिवस पाण्याखाली होते. तेथील पाणी कमी झाल्यानंतर स्वच्छता करण्यात आली. समाधीस्थळाचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले. मात्र प्रीतिसंगम बागेत पाणी शिरल्याने बागेतील ध्वनीयंत्रणेसह लॉन व अन्य बाबींचे नुकसान झाल्याची शक्यता असून सोमवारी बागेत स्वच्छता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थलांतरीत केलेले नागरिक स्वगृही परतू लागले
पाटण कॉलनीत पुराचे पाणी शिरल्याने पालिकेने दक्षतेचा उपाय म्हणून येथील जवळपास 55 कुटुंबातील 220 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले होते. रविवारी पुराचे पाणी ओसरल्याने यातील बहुतांश नागरिक स्वगृही परतले आहेत. मात्र घरी आल्यावर त्यांना प्रथम स्वच्छता व दुरुस्ती करावी लागली.