गोवा चेंबर, बार्जमालक संघटनेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
गोव्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी व सरकारी तिजोरीला दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर खाण व्यावसाय सुरू करावा, अशी मागणी गोवा चेंबर व बार्ज मालक संघटनेने राज्यपालांची भेट घेऊन केली. केंद्र सरकारच्या मागे लागून गोव्यातील खाण व्यावसाय सुरू करावा, असा आग्रह करण्यात आला. गोवा चेंबरचे अध्यक्ष मनोज काकुलो, तसेच बार्ज मालक संघटनेचे अतुल जाधव व चंद्रकांत गावस यांनी राज्यपालांची भेट घेतली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात दुरस्ती करावी, त्यासाठी आता राज्यपालांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. खाणी सुरू झाल्या तरच राज्यात आर्थिक स्थिती सुधारू शकते. सरकारला पैसा मिळण्याबरोबरच लोकांच्या हातीही पैसा येणार आहे. गोवा सरकार खाण व्यावसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण आता राज्यपालांनीही यामध्ये लक्ष घालून खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी केल्याचे मनोज काकुलो यांनी सांगितले.
हा विषय आता केंद्रीय मंत्रिमंडळाने घ्यायला हवा. कारण गोव्याची आर्थिक स्थिती वाईट आहे. एकही उद्योग चालत नाही. पर्यटन व्यावसायाही कोलमडला आहे. यामुळे खाणी सुरू करण्यासाठी एमएमडीआर कायद्यात दुरूस्ती करण्याची गरज आहे, असेही काकुलो यांनी सांगितले.
गोव्यातील खाण व्यावसाय सुरू करणे गरजेचे असून तरच गोव्यातील समस्या सुटणार आहे, असे अतुल जाधव यांनी सांगितले. चंद्रकांत गावस यांनी यामुळे गोवा सरकारला महसूल मिळणार आहे. खाण व्यावसायिकांनीही गोव्याचा विकास केला असल्याचेही स्पष्ट केले.