चोरीच्या घटनांमागे महाराष्ट्रातील तिघा सराईत चोरटय़ांचा सहभाग असल्याचे उघड
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांत अधूनमधून घरफोडीची प्रकरणे घडली आहेत. त्यामध्ये एखाद दुसऱया प्रकरणाचा अपवाद वगळता सर्व चोरी प्रकरणाचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले होते. त्यातच गेल्या नोव्हेंबर महिन्यात एकाच रात्रीत सहा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. पण याचाही पोलिसांनी जोरदार तपास सुरू केला होता. अखेर त्या सहाही चोऱयांचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. या चोरीच्या घटनामागे महाराष्ट्रातील तिघा सराईत चोरटय़ांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी हरिहर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांना खानापूर शहरात आणून तपास आणि चौकशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सचिन राजू माने ऊर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय 30) रा. अनिलनगर पंढरपूर शहर, जि. सोलापूर, सनी महेशकुमार तनोजा (वय 31) फताडे प्लॉट जुना कराड नाका पुणे, सारंग ऊर्फ सागर संजय तोळे (वय 25) रा. तानाजी चौक पंढरपूर शहर जि. सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हरिहर शहर पोलिसांनी तिघांना बेडय़ा ठोकल्या
हरिहर येथील घरफोडय़ांचा तपास करताना हरिहर शहर पोलिसांनी या तिघांना बेडय़ा ठोकल्या. तेथील चौकशीदरम्यान खानापूर शहरातील चोरीच्या घटनांचाही उलगडा झाला. त्यावरून पुढील तपासासाठी रविवारी खानापूर पोलिसांनी या तिघांना बॉडी वॉरंटखाली एका दिवसासाठी ताब्यात घेतले. तपास व चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून रविवारी सायंकाळी पुन्हा त्यांना खानापूर न्यायालयात हजर करून हरिहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी खानापूर शहरातील घरफोडय़ांची कबुली दिली आहे. त्यांचा संकेश्वर, निपाणी आणि दावणगिरी जिल्हय़ातील हरिहर येथील घरफोडय़ामध्ये सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या टोळीचा म्होरक्मया असलेल्या सचिन याच्यावर महाराष्ट्रातही विविध पोलीस स्थानकात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. येरवडा कारागृहात त्याने काही काळ तुरुंगवासही भोगला आहे. या टोळीने 27 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री शहरातील घोडे गल्ली, निंगापूर मुस्लीम गल्ली तसेच इतर ठिकाणी अशा एकूण सहा बंद घरांचे कुलूप तोडून या चोरटय़ांनी दीड लाख रोकड, अडीचशे ग्रॅम सोने व सव्वा किलो चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविला होता.
चालत फिरून जागेची टेहाळणी
घोडे गल्ली, बाजारपेठ आणि मुस्लीम निंगापूर गल्ली येथील घरांना चोरटय़ानी लक्ष बनविले होते. कारमधून आल्यानंतर हे टोळके शहरात चालत फिरून बंद घरांना आपले टार्गेट निश्चित करत असे, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शहरात विविध ठिकाणी सीसी कॅमेऱयात चारचाकी कारचा नंबर येणार नाही, याची दक्षता ठेवून ते तिघेही चोर केवळ रस्त्यावर चालत फिरून चोरी करण्याच्या जागेची टेहाळणी करत होते. व यानंतर आपला डाव साधत होते. असे एकूण तपासात उघडकीस आले आहे.