प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्याने सोमवारपासून हॉटेल्स, सलुन व बार वगळता सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकानदारांना व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मद्यविक्री दुकानदारांना मात्र सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे खानापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र सर्वच दुकाने सुरू झाल्याने सोमवारी शहरात खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. यामुळे मात्र एकीकडे व्यवहार सुरू असताना वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका उद्भवणार नाही का? अशी भिती मात्र प्रत्येकाच्या मनाला वाटू लागली आहे.
गेल्या 42 दिवसापासून कोरोना व्हायरसमुळे शहर व तालुक्यातील केवळ किराणा दुकाने तसेच औषधांची दुकाने सुरू होती. त्यालाही सकाळी 8 ते 12 पर्यंत वेळेची मर्यादा ठेवण्यात आली होती. यामुळे 8 ते 12 या वेळेत खरेदीसाठी थोडीफार गर्दी झाली तरी दुपारी 12 नंतर मात्र शहरात शुकशुकाट निर्माण होत होता. या काळात जनतेकडून नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस खाते, आरोग्य व महसूल खात्याकडून विशेष दक्षता घेतली जात होती. यामुळे खानापूर तालुक्यात क्वॉरंटाईन झालेल्यांची संख्या मोठी असली तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले होते. पण आता ऑरेंज झोनमुळे यासाठी असलेल्या नियमात शिथीलता आल्याने शहरातील स्टेशन रोड, बाजारपेठ परिसरात मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे सामाजिक अंतराचे तर पूर्णपणे उल्लंघन होत आहे.
सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे आता पोलिसांचे नियंत्रणही उरले नाही. त्यातच कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने हिरेबागेवाडी गाव, खानापूर तालुक्याच्या सीमेवरच असल्याने त्या भागातील भाजी विक्रेते व इतर व्यापारी खानापूरला येतात. गेल्या काही दिवसात त्या भागातून येणाऱया भाजी विक्रेते व इतर व्यापाऱयांवर बरेच नियंत्रण आणले होते. पण बदलत्या परिस्थितीचा त्या ठिकाणच्या भाजीविक्रेते व व्यापारीवर्ग गैरफायदा घेण्याची दाट शक्यता आहे. यामुळे खानापूर शहर व तालुक्याच्या ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला असला तरी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशा 12 तासाच्या वेळेला मर्यादा घालून पूर्वीप्रमाणे सकाळी 8 ते 12 हीच वेळ आणखी काही दिवस तरी ठेवावी, अशी मागणी केली जात असून या संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार आहे.
मद्यविक्री केंद्रावर मोठी गर्दीः लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर गेल्या 42 दिवसांपासून खानापूर तालुक्यातील सर्व मध्यविक्री दुकाने बंद झाली होती. त्यामुळे गेल्या 42 दिवसांत मध्यपिना दारू न मिळाल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. तालुक्यातील बरेच मद्यपी हुराक पिऊन समाधान मानत होते. पण हुराक पिण्यास बंदी असल्याने गेल्या काही दिवसात हुराक चोरुन विकणाऱयांवरही पोलीस अबकारी खात्याने धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई सुरू केल्याने हुराक मिळणे देखील कठीण झाले आहे. यामुळे मद्यपी लोक केव्हा एकदा दारू दुकाने उघडी होतात, याचीच वाट पाहत होते. साहजिकच दारू विक्रीलाही परवानगी मिळाल्याने सोमवारी सकाळी 9 वा. दारू दुकाने उघडली जाणार याची कल्पना मद्यपी लोकांना होती. यामुळे खानापूर शहर तसेच ग्रामीण भागातील दारूविक्री दुकानांसमोर अगदी पहाटेपासूनच मद्यपी लोकांनी रांग लावली होती. दारु विक्रेत्यांना सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करण्याची सूचना देण्यात आली होती. यामुळे प्रत्येक दारु दुकांनासमोर अंतर सोडून उभे राहता यावे यासाठी रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. काही जणांच्ग्नया दुकानातील स्टॉक मालही संपला आहे. अर्थसंकल्पात दारुचे दर 6 टक्कयाने वाढवण्यात आले आहेत. पण वाढीव दराने दारू विक्रीस परवानगी न मिळाल्याने जुन्या दरानेच दारू विकावी लागली