खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांचे आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहर व परिसरात होलिकोत्सव आणि रंगपंचमी शांततेने साजरी करावी, असे आवाहन खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी मंगळवारी तालुका पंचायत समितीच्या सभागृहात शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
यावेळी ते म्हणाले, खानापुरात कोणताही सण किंवा उत्सव असो, यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन तो यशस्वीपणे राबवितात. तीच परंपरा या पुढे देखील कायम ठेवावी, या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पोलीस खात्याकडून दक्षता घेतली जाईल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
प्रारंभी वासुदेव चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना संजय कुबल म्हणाले, खानापूर शहरात 18 मार्च रोजी होळी, दि. 22 मार्च रोजी रंगपंचमी व 23 रोजी निंगापूर गल्लीतील चव्हाटय़ाची जत्रा होणार आहे. हे तिन्ही उत्सव अत्यंत शांततेने पार पाडावेत, यासाठी पोलीस यंत्रणेला सर्व प्रकारचे सहकार्य करु, अशी ग्वाही दिली.
या बैठकीत पंडित ओगले यांनी रंगपंचमीचा उत्सव मंगळवार दि. 22 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करु, याचवेळी काही समाजकंठक प्रवृत्तीकडून गांज्या सेवन करुन गेंधळ केला जातो. अशा प्रवृत्तीचा मात्र पोलिसांनी योग्यप्रकारे बंदोबस्त करावा, अशी विनंती केली. यावेळी नगरपंचायत स्थायी कमिटी अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, प्रकाश देशपांडे, ऍड. आकाश अथणीकर यांनीही विचार मांडले.