तोडणी मजुरांचे दर भडकले : उचल होण्यास विलंब ; अद्याप बराच ऊस शिल्लक असल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर
खानापूर / वार्ताहर
यावर्षी साखर कारखान्याचा गळीत हंगामाला वेळीच सुरवात झाली असली तरी ऊस तोडणी मजूरांच्या अभावामुळे शेतकऱयाना वेळीच ऊस उचलीसाठी कसरत करावी लागत आहे. खानापूर तालुक्यात अद्याप बराच ऊस शिल्लक असून ऊस तोडणी मजुरांचे दरही भडकले आहेत. गळीत हंगामाच्या विलंबामुळे उसाची उचल होण्यास देखील विलंब होत चालल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडले आहेत. आपला ऊस साखर कारखान्याला कसा पाठवायचा याची त्यांना चिंता लागली आहे. खानापूर तालुक्यातील एकूण उसाच्या कार्यक्षेत्रापैकी केवळ 30 टक्के ऊस शेतात शिल्लक आहे.
दरवर्षी सुरुवातीच्या महिना ते दीड महिन्याच्या काळात खानापूरच्या लैला तसेच एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याबरोबरच संकेश्व़र, बेल्लद बागेवाडी, गोकाक, रेणुका नलवडे व गोव्याच्या संजीवनी शुगर्सकडून खानापूर तालुक्यातील उसाची उचल मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे ऊस पाठवण्यात शेतकऱयांना कोणत्याही अडचणी उद्भवत नव्हत्या. पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. गळीत हंगामाला वेळीच सुरवात झाली असली तरी अवेळी पावसाने शेतवडीतील वाहतुकीच्या रस्त्यांची अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले. पण आता रस्ते झाले असले तरी तोडणी मजूर मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
लैला-एम. के. हुबळी मलप्रभा साखर कारखान्यावर अधिक भर
साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील उसाची उचल करण्याकडे लक्ष घातले आहे. साहजिक यावर्षी खानापूर तालुक्यातून संकेश्वर, हल्याळ, बेल्लद बागेवाडी, नलवडे व गोकाक तालुक्यातील साखर कारखान्याकडून अत्यंत कमी प्रमाणात उसाची उचल केली जात असल्याने सारा भार खानापूरच्या लैला व एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्यावर पडला आहे.
लैला साखर कारखान्यावर उसाची मोठी प्रमाणात आवक सुरु आहे. या कारखान्यात आतापर्यत 1 लाख 25 हजार टन उसाचे गाळप झाले असून 1 लाख 95 हजार पोती साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यातच आता ऊस तोडणी मजुरानी आपले दर वाढवले आहेत. कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी टनाला 270 रु. इतकाच दर दिला जातो. तरीही ऊस तोडणी मजूर टनाला 600 ते 700 रु. घेत जादा दराची मागणी करत आहेत. त्यातच कारखान्याच्या ऊस तोडणीमुळे मर्यादित असल्याने ऊस उत्पादकाना खासगी तोडणी मजुराकडून ऊस तोड करुन द्यावी लागते.
ऊस कारखान्याला कसा पाठवावा याचीच चिंता
कारखान्याचे ऊस तोडणी मजूर आले तरी त्यांनाही टनाला तिनशे ते चारशे रु. ऊस उत्पादकाला द्यावे लागत आहेत. एवढा दर देऊनदेखील ऊस तोडणी मजूर वेळेत मिळणे कठीण, अशा परिस्थितीत ऊस साखर कारखान्याला कसा पाठवावा, याची चिंता खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांना लागली आहे.
ऊस जळाल्याच्या तालुक्यात आठ-दहा घटना
यावर्षी खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी वेगवेगळय़ा कारणामुळे संकटात सापडला आहे. यामध्येच काही ठिकाणी उसाचे मळे जळण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. आतापर्यंत ऊस जळाल्याच्या तालुक्यात आठ ते दहा घटना घडल्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱयाच ऊस उत्पादकांना पाण्यासाठी नदी-नाल्यावर अवलंबून रहावे लागते. पण तालुक्यामध्ये एप्रिल महिना आला की, नदी-नाल्यातील पाणी पूर्णत: आटून जाते. या परिस्थितीमुळे आपला ऊस लवकर पाठवून एप्रिल महिन्यापर्यंत उसाला जास्तीत जास्त पाणी देण्याचा ऊस उत्पादकांचा कल असतो. पण यावर्षी ऊस उत्पादकांचे हे गणीत देखील चुकणार असल्याने त्याचा परिणाम पुढीलवर्षाच्या ऊस उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.