प्रतिनिधी/ खानापूर
कोरोना महामारी आता खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही पोहोचली आहे. रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 78 वर पोहोचली आहे.
रविवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये खानापूर शहराजवळील असोगा गावातील एकाचा समावेश आहे. एडोगा गावातील एका माजी सैनिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त असून त्या दोघांनाही उपचारासाठी नंदगड येथील संगोळळी रायण्णा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथील सरकारी दवाखान्यात सेवेला असलेल्या एका महिलेलाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यात दररोज मिळत असलेल्या कोरोनाबाधितांमुळे याची व्याप्ती अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यातच आता गणेशचतुर्थीचा सण जवळ येत आहे. या सणासाठी खानापूर तालुक्यातील नोकरी-व्यवसायासाठी महाराष्ट्र, गोवा तसेच इतर राज्यात रहिवासी असलेले सणासाठी म्हणून तालुक्यात मोठय़ा प्रमाणात येतात. दरवर्षी ते गणेशचतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस येण्यास सुरुवात करतात. पण सध्या महाराष्ट्र, गोवा तसेच इतर प्रांतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशावेळी परप्रांतातून येणाऱयांना क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे मुंबईहून येणाऱया चाकरमान्यांना चौदा दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. यामुळे दोन्ही जिल्हय़ांतील चाकरमानी आतापासूनच सणासाठी आपल्या गावी येत आहेत. अशाप्रकारे खानापूर तालुक्यात येणाऱया परप्रांतीयांना 10 ऑगस्टपूर्वी येण्याचे बंधन घालावे व यानंतर परप्रांतीयांसाठी तालुक्याच्या सीमा सीलबंद कराव्यात. अन्यथा ऐन गणेशचतुर्थीच्या काळातही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.